नागपूर : राज्यात वन्यप्राण्यांकडून मानवी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. यापुढे अशा घटनांमध्ये निष्काळजीपणा केला गेला, तर संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा थेट इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी महसूलमंत्री बावनकुळे यांनी हा इशारा दिला. बैठकीला राज्यमंत्री आशीष जयस्वाल, आमदार परिणय फुके आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी यापूर्वीही सूचना दिल्या होत्या. निधीची कमतरता असेल तर जिल्हा नियोजन आराखड्यामधून पैसे उपलब्ध करुन दिले जातील, असे सांगूनही अधिकाऱ्यांनी ते गांभीर्याने घेतलेले नाही. आता तातडीने आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याबाबत मुख्य सचिवांच्या समितीकडे प्रस्ताव दाखल करण्यात यावा.

तातडीने निधीची व्यवस्था करण्यात येईल. अधिकाऱ्यांनी जगभरात चांगल्या पद्धतीचे जे तंत्रज्ञान वापरले जात आहे त्याचा अभ्यास करुन वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. मृत्यूनंतर भरपाई दिली जाते पण कोणाचाही जीव परत येत नाही. त्यामुळे जंगल कमी पडत असेल तर जंगलाजवळील मोकळ्या पडलेल्या जागा वनविभागाने खरेदी कराव्यात. वन्य प्राण्यांची व्यवस्था खासगी प्राणीसंग्रहालयांत करता येईल का, यावर गंभीरपणे विचार करा’ असे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले. जंगलातील काही भाग ‘ग्रासलँड’ म्हणून विकसित करण्याचा आणि वन्य प्राण्यांना त्यांच्या अधिवासातच उपजीविकेची सोय करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याचबरोबर, वन्य हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबातील वारसाला तातडीने शासकीय नोकरी देण्याचे आदेश देण्यात यावेत, असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले.

वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी या बैठकीत काही उपाययोजना सुचविण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-राज्यात वाढणारी वाघांची संख्या नियंत्रित करण्यासाठी दुसऱ्या राज्यांना वाघ देण्याची व्यवस्था आहे याबाबतही विचार करण्यात यावा.
-मानवी वस्तीत वन्य प्राण्याचा शिरकाव होऊ नये यासाठी सौर कुंपन करण्यात यावे.
-वन्य प्राण्यांच्या हालचालीबाबत ग्रामस्थांना आधुनिक तंत्राच्या माध्यमातून सूचना देण्याची व्यवस्था करण्यात यावी.
-अधिकाऱ्यांनी विविध देशात जाऊन त्याठिकाणच्या तंत्राचा अभ्यास करावा
-खासगी प्राणीसंग्रहालयांना जखमी वन्यप्राणी सोपविण्यात यावेत.