चंद्रपूर : वाघांच्या हमखास दर्शनाकरिता वन्यप्रेमींमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. याच प्रकल्पातील पळसगाव वनपरिक्षेत्रातील मदनापूर बफर झोनमध्ये नेहमीच व्याघ्रदर्शन होत असल्याने देश-विदेशातील पर्यटक या पर्यटन मार्गातून सफारी करतात. पर्यटकांचा मार्ग सुकर व्हावा, या उद्देशाने बफर क्षेत्रातील रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामाकरिता जंगल क्षेत्रातीलच मुरुम उत्खनन करून वापरला जात असल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाकरिता मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती, उद्योजक, खेडाळू, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गनमान्य व्यक्ती येतात. पर्यटकांना या क्षेत्रात वाघांसह इतर वन्यप्राण्यांचे दर्शन होते. त्यामुळे पर्यटकांची मदनापूर बफर क्षेत्रात खूपच वर्दळ असते. या पर्यटन मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, तर कुठे रस्त्यावरील मुरुम वाहून गेला आहे. त्यामुळे पर्यटकांसह जिप्सीचालकांनी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.
त्यानुसार वरिष्ठांच्या दिशानिर्देशानंतर निविदा काढून रस्त्याच्या कामाचे कंत्राट वनविभागाकडून देण्यात आले. त्याप्रमाणे बफर क्षेत्रातील जवळपास दहा किलोमीटर रस्त्याचे व दोन्ही बाजूला नालीचे काम सुरू आहे. मात्र, या कामात मदनापूर बफर क्षेत्रातीलच मुरुम वापरला जात आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आहे. करबडा, कक्ष क्र-१०२, १०३, १०४ येथे मुरुम उत्खननामुळे पडलेले खड्डे वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतात, अशी भीती वर्तवली जात आहे.
ज्यांच्या जीवावर वनविभाग पर्यटनातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवते, त्याच वन्यप्राण्यांची सुरक्षितता धोक्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत चौकशीची मागणी केली जात आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी मदनापूर बफर क्षेत्रात रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामाकरिता जंगल क्षेत्रातीलच मुरुम उत्खनन करून वापरला जात असल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी पर्यटक, जिप्सीचालक-मालक व मार्गदर्शक यांच्याकडून सातत्याने होत होती. मागील दोन वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती झाली नव्हती. यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने निविदा काढून रस्ते दुरुस्ती सुरू आहे. याकरिता जंगलातीलच मुरुम वापरला जात आहे. मात्र, उत्खननामुळे कुठेही मोठे खड्डे पडलेले नाहीत, ज्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितला धोका निर्माण होईल.- योगीता आत्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी, पळसगाव (बफर)