लोकसत्ता टीम

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटास मिळणार, हे स्पष्ट झाल्यानंतर सर्वप्रथम तयारीस लागलेले समीर देशमुख यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. प्राप्त माहितीनुसार, त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून रोहित पवार प्रयत्नशील होते. म्हणून त्यांनी शरद पवार यांच्याशी बोलणे केले होते. सोमवारी त्यांनी समीर देशमुख यांना विचारणा केली. पण नकार आला. तत्पूर्वी माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी मुंबईत शरद पवार यांना भेटून यावेळी लढण्याची तयारी नसल्याची भूमिका मांडून समीर देशमुखही लढणार नाही, असे स्पष्ट केले.

आपण द्याल त्या उमेदवारसाठी आम्ही सर्व ते प्रयत्न करणार, अशी हमी देत प्रा. देशमुख यांनी माघार नोंदविली. रोहित पवार यांना समीर लढणार नसल्याचे शरद पवार यांनी प्रा. देशमुख यांचा दाखला देत कळविले. सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले आणि इकडे सहकार गटात स्मशानशांतता पसरली.

आणखी वाचा- “उमेदवारी आपलीच आहे, विजय आपलाच आहे,” आमदार प्रतिभा धानोरकर यांची पोस्ट चर्चेत

आम्ही लढणार नसल्याचे कळविले असल्याचे प्रा. देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यात प्रत्येक गावात अस्तित्व राखून असणारा सहकार गट निवडणुकीत मोलाची भूमिका पार पडतो. तो यावेळी प्रथमच लोकसभा निवडणूक लढण्यास तयार झाला होता. पण पुत्र समीर यांस सध्या लढणे नकोच, असे समजावून सांगत प्रा. देशमुख यांनी मूठ झाकून ठेवण्याचा पर्याय निवडला, असे गटातील लोकांचे म्हणणे आहे.