नागपूर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी (२१ एप्रिल) नागपुरातील रवीभवन येथे त्यांचा पक्ष देशातील दोन महत्वाच्या राज्यात एकही जागा न लढवता सगळ्याच जागांवर भाजपच्या उमेदवारांना समर्थन देणार असल्याची महत्वाची घोषणा केली. सतत सत्ताधारी भाजपला स्वत:च्या पक्षासाठी सत्तेत वाटा मागणाऱ्या पक्षाकडून दोन राज्यात भाजपच्या सर्व उमेदवाराला समर्थनाच्या मूळ घोषणेबाबत आपण जाणून घेऊ या.
आरपीआय आठवले पक्षाची नागपुरातील रवीभवन येथे विदर्भ स्तरीय बैठक झाली. त्यापूर्वी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागपूर विभागातील विविध योजनांचा आढावा घेतला. या दोन्ही बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले म्हणाले, आरपीआय आठवले पक्षाची महाराष्ट्रासह देशातील सगळ्याच राज्यात आता चांगलीच ताकद वाढली आहे. नागालॅन्डमध्ये पक्षाने ८ विधानसभेच्या जागा लढवल्या होत्या. त्यापैकी दोन जागा जिंकल्या असून बऱ्याच दागेवर त्यांचे उमेदवार दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांवर आहे.
मनिपूरमध्ये एका लोकसभेच्या जागेवर आरपीआय उमेदवाराला दीड लाखावर मते घेतली. त्यामुळे येत्या काळात येथे आरपीआय निश्चित सत्तेवर येईल. दरम्यान लवकरच बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या दोन्ही राज्यात भाजप आणि मित्रपक्षांच्या बाजूने वातावरण आहे. पश्चिम बंगालमध्ये मागच्याच वेळी भाजपचे सरकार येणार होते. परंतु काँग्रेस आणि डाव्या पक्षांना अपेक्षीत मते मिळाली नसल्यावे ममता बँनर्जी यांचा तृनमुल पक्ष सत्तेवर आला. परंतु ममता बॅनर्जीच्या सरकारकडून गुंडगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.
त्यामुळे तेथील जनता परिवर्तनाच्या बाजूने दिसत आहे. तेथे सत्तापरीवर्तनासाठी यंदा आरपीआयकडून भाजपच्या सगळ्याच उमेदवारांना समर्थन देत आहे. तेथे आमचे उमेदवारांनी काही मते घेतल्यास भाजपला अडचण येऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचेही आठवले म्हणाले. बिहारमध्येही आरपीआयची ताकद आहे. परंतु तेथेही नितीश कुमार आणि भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर यावे म्हणून भाजपच्या सगळ्याच उमेदवारांना समर्थन देत असल्याचेही आठवले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पक्षाचे नेते राजन वाघमारे, अॅड. विजय आगलावे, बाळासाहेब घरडे, विनोद थुल आणि इतरही नेते उपस्थित होते.
अमेरिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे…
अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रच्या कार्यालय, भारतीय दुतावास आणि इतरही काही संस्थांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी आमंत्रन आले होते. त्यामुळे यंदा या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी अमेरिकेत गेलो होतो. बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेल्या तेथील कोलंबिया विद्यापीठासह इतरही काही भागात भेटी दिल्या. तेथील नागरिकांकडून तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार व्हावे, अशी मागणी आहे. त्यामुळे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही रामदार आठवले म्हणाले