लोकसत्ता टीम
वर्धा: सेवाग्राम येथील डॉ. विठ्ठल सर्जेराव साळवे यांनी सेलू तालुक्यातील रिधोरा धरणात आत्महत्या केल्याचे उघडकीस आळ्याने एकच खळबळ उडाली. त्यांचा मृतदेह शनिवारी दुपारी जलाशयात आढळून आला. ते शुक्रवारपासून बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांचा शोध नातेवाईक व मित्रमंडळी घेत होते. शोध घेत असताना मृताची दुचाकी धरणाच्या पायथ्याशी दिसून आली. शोध घेणाऱ्यांनी जलाशयात डोकावल्यावर त्यांना डॉक्टरचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसला.
रिधोराचे माजी सरपंच अरविंद सिराम यांनी या घटनेची माहिती सेलू पोलीसांना दिली. ठाणेदार रवींद्र गायकवाड यांनी घटनास्थळी पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही आत्महत्या असून शुक्रवारी सायंकाळी घडली असावी, असा कयास बांधण्यात येत आहे. मृत डॉ. विठ्ठल (३७) यांनी सेवाग्रामच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस व एमडी हे शिक्षण घेतले होते. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करायचे. सेवाग्रामलगत धन्वंतरी कॉलनी येथे त्यांचे घर होते.