नागपूर : राज्यात मुली व महिलांवरील लैंगिक अत्याचारात पुन्हा वाढ झाली असून महिलांवरील बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे मुंबई आणि पुण्यात दाखल झाले तर नागपुरात मात्र गुन्ह्यांत घट झाली आहे. गेल्या चार महिन्यांत मुंबईत ३८१ गुन्हे तर पुण्यात १८६ बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत, ही धक्कादायक माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरुन मिळाली आहे. यावरुन राज्यात मुली व महिलांसाठी सुरक्षित वातावरण नसल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

महिलांच्या तक्रारींना प्राधान्य द्यावे आणि गांभीर्याने तपास करावा, अशा सूचना गृहमंत्रालयाकडून पोलीस विभागाला मिळाल्या आहेत. शाळकरी मुली आणि महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या घटनांमध्ये घट व्हावी, यासाठी पोलीस महासंचालकांकडूनसुद्धा पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. मात्र, असे असतानाही गेल्या चार महिन्यांतील गुन्ह्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना पुन्हा वाढ झाल्याचे दिसते. अल्पवयीन मुली, तरूणी आणि विवाहित महिलांवर बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यासोबतच अश्लील चाळे, शेरेबाजी, लज्जास्पद वर्तन आणि विनयभंगाच्याही घटनांमुळे राज्य हादरले आहे.

गेल्या चार महिन्यात मुंबई शहरात बलात्काराचे ३८१ गुन्हे दाखल असून यामध्ये ३३० आरोपींना पोलिसांनी अटक केली. एप्रिल महिन्यात सर्वाधिक १०६ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. बलात्काराच्या घटनांमध्ये पुणे शहराचा राज्यात दुसरा क्रमांक असून १८६ लैंगिक अत्याचाराची नोंद आहे. तर ठाण्यात १६२ गुन्हे तर पिंपरी-चिंचवडमध्ये ८३ गुन्हे दाखल आहेत. गृहमंत्र्याचे शहर नागपुरात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाली असून ६२ बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. राज्यात मात्र, महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभाग सपशेल अपयशी ठरला आहे.

आरोपींमध्ये सर्वाधिक नातेवाईक-प्रियकर

शाळकरी मुलींसह तरुणी-महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींमध्ये सर्वाधिक व्यक्ती परिचय किंवा ओळख असलेली आहे. नातेवाईक, प्रियकर, मित्र, शेजारी, वर्गमित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडून मुली-विवाहितांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची माहिती काही घटनांमधून समोर आली आहे. अनेक प्रकरणात महिला बदनामी किंवा कुटुंबाची प्रतिष्ठा मलिन होण्याच्या भीतीने लैंगिक अत्याचार सहन करुन तक्रार देण्यास समोर येत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुली-महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची पोलीस गांभीर्याने दखल घेतात. अशा गुन्ह्याचा तपासही प्राधान्याने करण्यात येते. त्यामुळेच महिलांवरील गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. – राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.