नागपूर: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सुद्धा मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर रोज बोलत आहेत. त्यामुळे राज्यात या युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच ज्योतिष्यपीठ आणि द्वारकापीठाचे उत्तराधिकारी शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती यांनी नागपूरमध्ये मोठे विधान केले आहे. यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या मुद्याची पुन्हा एकदा चर्चा रंगणार आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्ववादावरही मोठे विधान केले.

शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान अनेक राजकीय नेते त्यांची भेट घेत आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी दुपारी रविभवन येथे शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती यांची भेट घेतली. राजकारणात सेवा करत असतानाच त्यांना अध्यात्मावरही विश्वास आहे. अमरावती येथील एका कार्यक्रमातून परतताना नागपूरमध्ये स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती असल्याचे कळले.

त्यांच्याकडून दीक्षाही घेतली आहे. त्यामुळे दर्शनासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती यांनी वृत्तवाहिणीसोबत बोलताना सांगितले की, आमच्याकडे पंकजा मुंडे अनेक वर्षांपासून येतात. त्यांच्या आई वडिलांचे त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत. त्यामुळेच ती माझी शिष्या आहे. पंकजा अध्यात्माचे ज्ञान पूर्णपणे ठेवते. ती धार्मिक आहे आणि अध्यात्मिकही आहे.

राज, उद्धव युतीबद्दल नेमके काय म्हणाले?

बाळासाहेब ठाकरे हिंदूत्वासाठी ओळखले जात होते. शिवसेनेची स्थापनाच हिंदूत्ववादी पक्ष म्हणून झाली होती. आता जर अराजक आणि धर्मविरोधी तत्वांना सोडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हिंदूत्वाच्या भूमिकेवर आले तर त्यांचे स्वागत आहे. केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच नाही तर सनातन विचारधारेच्या सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवे असेही शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताची विचारधारा धार्मिक आहे. सर्वच पक्ष धार्मिक व्हायला हवी. सर्व पक्ष जर सनातन विचारांचा स्वीकार करतील तरच देशाचा विकास होईल. आम्ही कधीही कुणाचा विरोध करत नाही. सनातन धर्म विश्वकल्याणाचे काम करते. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे आणि देशाचा विकास करावा, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.