बुलढाणा : मागील १९८७ पासून पाकिस्तानने आतंकवादाचा वापर करुन लाखो भारतीयांचे प्राण घेतले, काश्मीर खोऱ्यातून हिंदूंना विस्थापित केले. हा पाक पुरस्कृत आतंकवादाची मालिका अजूनही कायम आहे.

पहेलगाम येथील अतिरेक्यांचा हल्ला याचाच परिपाक आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राईल सारखी रोखठोक भूमिका घेणे काळाची गरज आहे. नुसते जल करार स्थगित करुन काहीच साध्य होणार नाही. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतल्याशिवाय आतंकवादाची समस्या दूर होणार नाही असा घणाघात, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी येथे केला. राज्यात पोलीस (गृह) विभागासारखा भ्रष्ट व आकार्यक्षम विभाग दुसरा नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मलकापूर मार्गावरील आपल्या जनसंपर्क कार्यालयात आमदार संजय गायकवाड यांनी आज शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी दुपारी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित दौऱ्याची माहिती दिली. याचबरोबर पहेलगाम अतिरेकी हल्ल्यासह विविध विषयावर चर्चा करीत आपल्या आक्रमक शैलीत उत्तरे दिली.

ते म्हणाले की, आतंकवाद ही जुनी समस्या आहे. जगात साठच्या आसपास मुस्लिम राष्ट्र आहे. मात्र, आतंकवाद म्हटले की पाकिस्तानचे नाव समोर येते. पाक पुरस्कृत आतंकवाद करोडो भारतीयांसाठी भळभळती जखम आहे. पहेलगाम हल्ल्यामुळे ही जखम पुन्हा ओली झाली आहे. आपल्याला जगावेगळे समजणाऱ्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्याची आता खऱ्या अर्थाने वेळ आली आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडून देशाला कठोरतम कारवाईची अपेक्षा आहे. सिंधु जल करार रद्द करुन काहीच लाभ होणार नाही. मोदी यांनी इस्त्राईल सारखी रोखठोक भूमिका घेऊन शत्रूचा सफाया करणे, नेस्त नाबूत करणे अपेक्षित आहे. आतंकवाद्यांची भूमी असलेल्या पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन तिथे नवीन सीमा तयार करणे काळाची गरज ठरली आहे.

राज्यात पोलिसांसारखे भ्रष्ट, अकार्यक्षम खाते कोणतेच नाही, असा घणाघाती आरोपही आमदारांनी यावेळी केला. कोणतीही बंदी आली की यांचा नवीन हफ्ता सुरु होतो, असे ते म्हणाले. पत्र परिषदेला युवा सेनेचे मृत्युंजय गायकवाड उपस्थित होते.

आर्थिक तूट अन् ठाकरे बंधू

राज्याची आर्थिक स्थिती सध्या बिकट असल्याचे सांगून अब्जावधी रुपयांची तूट आहे. यामुळे नगर विकास, जल संधारण, बांधकाम सारख्या विभागचा निधी रखडला आहे. इतर विकास निधीवरही परिणाम झाला आहे. ही तूट भरून काढायला एक वर्ष लागेल असा अंदाज त्यांनी बोलून दाखविला. उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेबद्दल विचारणा केली असता त्यांनी चर्चेची खिल्ली उडविली. या दोन्ही बंधूच्या पक्षाची ताकद काय, किती असा उलट प्रश्न विचारून ते एकत्र आले तर काय होणार? असा सवाल त्यांनी केला.

असा आहे एकनाथ शिंदेचा दौरा

शिवसेना नेते तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २७ रोजी बुलढाणा शहरात मतदारांचे आभार मानण्यासाठी येत असल्याची माहिती गायकवाड यांनी यावेळी दिली. लोकसभेत प्रतापराव जाधव आणि बुलढाणा विधानसभेत आपणास विजयी केल्याबद्धल लाडक्या बहिणी, लाडके भाऊ यांचे ते यावेळी आभार मानणार आहे. येत्या रविवारी सकाळी साडे दहा वाजता त्यांचे बुलढाणा नगरीत आगमन होणार आहे. आगमन झाल्यावर ते पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्या समवेत शासकीय विश्रामगृहात चर्चा करणार आहे. यानंतर नजीकच्या जिजामाता क्रीडा व्यापार संकुलात आयोजित सभेला संबोधित करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.