चंद्रपूर: बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असा केवळ १७ वर्षाचा राजकीय प्रवास दिवंगत खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचा राहिला आहे. या सतरा वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत धानोरकर यांनी अनेक चढउतार पाहिले. भावाला भद्रावती नगर परिषदेचा नगराध्यक्ष करण्यापासून तर पत्नी प्रतिभा धानोरकर यांना भद्रावती – वरोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

चद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या भद्रावती शहरातील स्थानिक शाखेचे प्रमुख, त्यानंतर तालुका प्रमुख ते २००६ मध्ये जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. त्यांना २००९ साली शिवसेनेने याच क्षेत्रातून उमेदवारी दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.

हेही वाचा >>> राज्यातील लोकसभेच्या दोन जागा रिक्त पोटनिवडणुका बंधनकारक आहेत का?

२०१४ पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली. तेव्हाचे कॅबिनेट मंत्री दिवंगत संजय देवतळे यांचा पराभव केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला व कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला.

हेही वाचा >>> चंद्रपूर: खासदार धानोरकर रुग्णालयात असताना विरोधकांनी साधला डाव

राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले. लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला. तसेच भद्रावती नगर परिषदेत सलग १५ वर्षापासून एकहाती सत्ता कायम ठेवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका , मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरलेत. विविध पक्षात त्यांची मैत्री कायम होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी जवळीक होती. त्यांचा राजकीय प्रवास हा वादळी होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी २०२४ च्या निवडणुकीत वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढण्याचे आवाहन दिले होते.