नागपूर : राज्य सरकारने आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचे निधी लाडकी बहिणी योजनेवरील खर्चासाठी वळता केला आहे. सामाजिक न्याय मंत्र्यांनी याची स्वत:च कबुली दिली आहे तर आदिवासी विकास मंत्री सारावसारव करीत आहेत, असा दावा माजी सामाजिक न्याय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

राज्यघटनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येनुसार त्यांच्या कल्याणासाठी निधीची तरतूद करणे बंधकारक आहे. दरवर्षी अर्थसंकल्पातील त्या प्रमामात तरदूत करावी लागते. शिवाय तो निधी इतरत्र खर्च करता येत नाही किंवा वळवता येत नाही. परंतु सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळता करण्यात आला आहे. एक महिन्यांनी तो परत दिला गेला. सामाजिक न्याय मंत्र्यांनीच हे सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारचे इतर मंत्री काय बोलतात, याला काही अर्थ नाही. आमची सरकार असताना आपातकालिन स्थिती निधी वळवायचे झाल्यास तसा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला जात असे. आताची सरकार तर परस्पर निधी वळवत आहे आणि दुसऱ्या महिन्यात ती परत संबंधित विभागाच्या खातात जमा टाकत आहे, असा दावाही मोघे यांनी केला.

राज्यातील आणि केंद्रातील सरकारन शेतकऱ्यांबाबत उदासिन आहे. त्यामुळे प्रशासनही असंवेदनशिल झाले आहे. गेली दहा-अकरा वर्षांत केंद्र व राज्य सरकारने शेतकरी विरोधी धोरणाचा सपाटा लावला आहे. गरज नसताना शेतमालावर निर्यातबंदी करणे व आयात वाढवून शेतमालाचे भाव पाडण्याचे कटकारस्थान केले. अर्थसंकल्पात शेतीवरील खर्चात कपात करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कंगाल करून सोडले. सरकारने शेतकऱ्यांचे शोषण त्वरित थांबवावे. आश्वासनाप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी करून त्याला जगण्याचे बळ द्यावे, सरकारच्या बेबंद धोरणातून त्याची सुटका व्हावी यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा आहे, असेही मोघे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३ जूनला शेतकरी पदयात्रा व मेळावा

संपर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, शेतमालाला हमीभाव, सरसकट पिकविमा, शेतीला मोफत विज, वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी कुंपण यास इतर मागण्यांसाठी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा आणि शेतकरी मेळावा आर्णी येथे ३ जूनला आयोजित करण्यात येत आहे. यात्रा सकाळी ९ वाजता श्री ओंकाररेश्वर मंदिर दाभडी, ता. आर्णी येथून होईल व कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्णी येथे समारोप होईल. येथे शेतकरी मेळावा होईल, असेही मोघे यांनी सांगितले.