राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि नौदल अकदामी (एनए) परीक्षेसाठी रेल्वेने ५ आणि ६ सप्टेंबरला मुंबई, पुणे, बल्लारशहा, अमरावती येथून नागपुरात येणाऱ्या आणि येथून निघणाऱ्या २० विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मेमू वगळता इतर विशेष गाडय़ातून आरक्षित तिकीट घेऊन प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी आरक्षण ४ सप्टेंबरपासून सुरू झाले.

मध्य रेल्वे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी राज्यातील विविध शहरातून नागपुरात येणाऱ्या दहा गाडय़ा आणि येथून जाणाऱ्या दहा गाडय़ा ५ आणि ६ सप्टेंबरला सुटतील. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर ५ सप्टेंबरला दहा गाडय़ा येतील आणि टाळेबंदीनंतर प्रथमच नागपूर स्थानक प्रवाशांचा कोलाहल अनुभवेल. पुणे ते नागपूर विशेष गाडी  उद्या शनिवारी निघेल आणि ६ सप्टेंबरला परत जाईल. ही गाडी २५ डब्याची राहणार असून १९ स्लिपर क्लास आणि ६ द्वितीय श्रेणी डबे राहतील. या गाडीला दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमानड, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत.

मुंबई ते नागपूर ही विशेष गाडी ५ सप्टेंबरला निघेल आणि मुंबईला ६ सप्टेंबरला परत जाईल. ही गाडी दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, भूसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबणार आहे.

याशिवाय कोल्हापूर ते नागपूर, नाशिक ते नागपूर, जळगाव ते नागपूर, अकोला ते नागपूर, अहमदनगर ते नागपूर, पनवेल ते नागपूर विशेष गाडी ५ सप्टेबरला सोडण्यात येणार आहे.

अमरावती, नागपूर मेमू विशेष गाडी

अमरावती ते नागपूर मेमू विशेष गाडी आणि बल्लारशहा ते नागपूर मेमू विशेष गाडी  ६ सप्टेंबरला सोडण्यात येणार आहे. अमरावतीहून ५ सप्टेंबरला रात्री १२.१५ वाजता ही गाडी निघेल णि नागपुरात पहाटे ५.२५ वाजता पोहोचेल. तर ६ सप्टेबरला रात्री ११ वाजता नागपूरहून निघेल आणि अमरावतीला पहाटे ४ वाजता पोहोचेल. बल्लारशहा ते नागपूर मेमू विशेष गाडी बल्लारशहाहून दुपारी १२.३० वाजता निघेल आणि दुपारी ४.४५ वाजता नागपुरात पोहोचेल. तर नागपूरहून रात्री ११.१५ वाजता निघेल आणि बल्लारशहाला पहाटे ४ वाजता पोहोचेल.