लोकसत्ता टीम

नागपूर: एकीकडे शासन शालेय शिक्षणावर हजारो कोटी रुपये खर्च करीत असताना दुसरीकडे समाजातील वंचित वर्ग अजूनही शिक्षणापासून वंचित आहे. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असाच आहे. घर नसल्याने ही मुले भटकंती करीत असतात. शाळेत जात नाही. त्यांना शिकवण्यासाठी राज्य शासनाने एक प्रकल्प हाती घेतला आहे. एक फिरती बस ज्यात मुलांना शिकवण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध असेल ती मुलांचा शोध घेऊन त्यांना शिकवेल.

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक तयार केले आहे. यात शिक्षक आणि समुदेशकही असणार आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने राज्यात नागपूरसह सहा जिल्ह्यांत पथदर्शी फिरते पथक हा प्रकल्प राबवला जात असून तो सहा महिन्याकरिता आहे. प्रकल्पासाठी सह्याद्री फाऊंडेशन या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या पथकात एका बसची व्यवस्था करण्यात आली असून त्यात २५ मुलांची आसन क्षमता आहे. त्यात मुलांकरिता एक समुपदेशक, एक शिक्षक, एक काळजी वाहक असेल. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व ट्रॅकिंग सिस्टिम लावण्यात आली आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर : वाघांच्या शिकारप्रकरणी दिल्लीतील सेवानिवृत्त वनाधिकाऱ्याला अटक

ही बस ज्या ठिकाणी रस्त्यावर मुलांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी जाईल. तेथील शाळेत न जाणाऱ्या सहा वर्षांखालील बालकांना बालकांना अंगणवाडी केंद्रासोबत संलग्न करण्यात येईल. मुलांना पोषक अन्न देण्यात येणार आहे. त्या बालकांचे आधार कार्ड तयार केले जाईल. बालके अनाथ असेल तर बाल कल्याण समिती समक्ष हजर करण्यात येईल. बालकांना खेळ, शैक्षणिक साहित्य, गाणी, नृत्य या गोष्टींद्वारे त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी या बसला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी विभागीय उपायुक्त महिला बाल विकास विभाग अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी भारती मानकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी चंद्रकांत बोन्डे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, सह्याद्री फाऊंडेशनचे संचालक देवेंद्र श्रीरसागर यावेळी उपस्थित होते.