नागपूर : इंडिया आघाडीमध्ये एकही नेता असा नाही की त्यांच्यावर आरोप नाहीत. लालूप्रसाद यादव म्हणतात मी पंतप्रधानाच्या नरडीवर बसायला चाललो. हा देशाचा आणि जनतेचा अवमान नाही का? ही जनता लोकशाहीच्या मार्गाने इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांना तिरडीवर बसवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. सुधीर मुनगंटीवार नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
एकीकडे शरद पवार म्हणतात आम्ही दोषी असू तर चौकशी करा आणि दुसरीकडे चौकशी सुरू झाली तर मग ईडीचा दुरुपयोग वाटतो. ईडीचा जन्म हा काँग्रेसच्या काळात २००५ पासून झाला २०१४ पर्यंत २२०० पेक्षा जास्त केसेस दाखल झालेल्या होत्या. त्यामुळे ईडीवर आरोप करणे म्हणजे देशाचा अवमानच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना सीबीआयमध्ये बसून ठेवले होते, तो संस्थांचा सदुपयोग होता का. गृहमंत्री अमित शहा यांना एका बनावट प्रकरणामध्ये कारागृहात टाकले होते. सुरेश कलमाडी, मायावती, अखिलेश यादव या सर्वांच्याबद्दल जेव्हा चौकशी होते, तेव्हा तो दुरुपयोग नसून सदुपयोग होतो का? असा प्रश्न उपस्थित करत कायदा आपला काम करतो आणि दोषी नसल्यास अहवाल देऊन चौकशी बंद होते, असेही मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा – नागपूर: भर पावसाळ्यात प्रथमच भारनियमन, तब्बल ९०० मेगावॅट…
वन नेशन वन इलेक्शन याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. काँग्रेस सरकार असताना यावर चर्चा झाली होती. त्यावेळेससुद्धा प्रत्येक राज्याचे मत जाणून घेतले होते. राज्य सरकारच्या वतीने त्यावेळेस मत मांडले होते, असेही मुनगंटीवार म्हणाले.