अमरावती : प्रवाशांना अधिक जलद गतीने संबंधित स्थानकावर पोहोचता यावे यासाठी मध्य रेल्वेतर्फे सुरक्षित प्रवासासह गाड्यांचा वेग अधिकाधिक कसा करता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकत्याच केलेल्या गती चाचणीत सहा रेल्वेगाड्यांनी इगतपुरी-भुसावळ-बडनेरा हे ५२६ किलोमीटरचे अंतर १३० किलोमीटर प्रति तास या वेगाने कापले. लवकरच इगतपुरी-भुसावळ-बडनेरा दरम्यान एकूण ६७ रेल्वेगाड्या १३० किमी प्रति तास या गतीने धावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हेही वाचा - नागपूर : महामेट्रोचा जाहिरातींवर तीन कोटींहून अधिकचा खर्च हेही वाचा - नागपूर : ‘सरकार आपल्या दारी’ तरीही, प्रमाणपत्रासाठी भटकंती कायम मध्य रेल्वेने १२२८९ /९० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस, १२१०५ /०६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस आणि १२८५९ / ६० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा गीतांजली एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांची अप आणि डाऊन मार्गावर गती चाचणी घेतली. २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या या चाचण्या यशस्वी ठरल्या. डाऊन मार्गावर या एक्स्प्रेसने नियोजित अंतर ठरलेल्या वेळेपेक्षा २८ मिनिटे, तर अप मार्गावर अर्धा तास कमी वेळात कापले, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.