लोकसत्ता टीम

वर्धा : उद्या १९ नोव्हेंबरला होणाऱ्या भारत – ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचसाठी सुजात आंबेडकरांनी वर्धा येथे १९ नोव्हेंबरला होणारी शिक्षण हक्क परिषद रद्द केली आहे.

मागील १५ दिवसापासून वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी या परिषदेची जय्यत तयारी चालविली होती. शहरात प्रत्येक चौकात आकर्षक होर्डिंग्स लावले, जिल्हाभर हस्तपत्रके वाटून माहिती दिली. ग्रामीण भागातून अनेक गाड्या बुक केल्या, मंच आणि साउंड सिस्टमसाठी अडवान्स दिला, ध्वनीक्षेपकावरून जाहिरात केली, तब्बल ५००० प्रतिनिधीना बसण्यासाठी खुर्च्या ठरविल्या, ५०० युवकांच्या बाईक रॅलीची तयारी केली, पाहुण्यांच्या निवासाची व्यवस्था बुक केली. एवढी जय्यत तयारी होऊनही सुजात आंबेडकरांनी जिल्हाप्रभारी इंजि. बंडू नगराळे यांच्याशी संपर्क करून केवळ भारत-ऑस्ट्रेलिया मॅचसाठी ही परिषद रद्द करून पुढील तारीख कळविणार असल्याचे सांगितले. नगराळे यांनी तत्काळ ही माहिती विदर्भ समन्वयक किशोर खैरकर , आशीष गुजर व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिली. ही माहिती मिळताच कार्यकर्त्यांचा क्षणिक हिरमोड झाला, मात्र सर्व कार्यकर्त्यांनी सुजात आंबेडकरांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आणखी वाचा-भारतातील पश्चिम घाट ठरले सुंदर प्रजातींचे माहेरघर; तामिळनाडूत दोन नव्या पालींच्या प्रजातींचा शोध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०११ नंतर भारताला क्रिकेट वर्ल्डकप जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. सुजात आंबेडकरही क्रिकेटप्रेमी असून त्यांचे या मॅचकडे लक्ष आहे. वंचितच्या कार्यकर्त्यांनी शक्य तिथे एलइडीची व्यवस्था करून मॅचचा आनंद घ्यावा, आपल्या जागी भारताला चिअरअप करावे, अशा सूचना करून ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे ‘ याचा प्रत्यय देत सुजात आंबेडकरांनी आंबेडकरी देशप्रेम दाखवून दिले, अशी चर्चा होत आहे.