लोकसत्ता टीम

अमरावती : नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवून सर्वोच्‍च न्‍यायालयाने एक प्रकारे नवनीत राणा यांना आशीर्वाद दिला असून आजवर या मुद्यावर जे लोक पोपटासारखे बोलत होते, त्‍यांच्‍या तोंडावर बसलेली ही एक थापड आहे. अमरावतीतून नवनीत राणा या प्रचंड बहुमताने निवडून येतील, असा दावा उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी येथे केला.

भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्‍याआधी दसरा मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निकालाची माहिती दिली. नुकताच न्‍यायालयाने निकाल देताना नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. ८० वर्षांपुर्वीचे दस्‍तावेज आणि सुमारे ३०० कागदपत्रे न्‍यायालयात सादर करण्‍यात आली होती. ती न्‍यायालयाने वैध ठरवून नवनीत राणा यांना देण्‍यात आलेले प्रमाणपत्र खरे आहे, असा निकाला दिला आहे. सत्‍याचा विजय झाला आहे. जे आजवर या मुद्यावर पोपटासारखे बोलत होते, ते खोटे ठरले आहेत. विरोधकांच्‍या तोंडावर बसलेली ही चपराक आहे. उमेदवारी अर्ज भरण्‍याच्‍या दिवशी सर्वोच्‍च न्यायालयाचा आशीर्वाद त्‍यांना मिळाला, आता जनतेचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद मिळून प्रचंड मतांनी या ठिकाणी खासदार होणार आहेत, असे फडणवीस म्‍हणाले.

आणखी वाचा-‘प्राथमिक शिक्षकांना सक्रिय राजकारणात सहभागी होण्याचा अधिकार’

नवनीत राणांच्‍या विरोधात कुणी कितीही बोलले, तरी त्‍याच्‍याकडे लक्ष देऊ नका, त्‍यांनी पाच वर्षांत केलेली कामे जनतेसमोर आहेत. कुणी कितीही दुषणे दिली, तरी त्‍याची चिंता करू नका. त्‍यांना हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्‍त झाला आहे. केवळ हनुमान चालिसाचे पठण करणार म्‍हणून महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात उद्धव ठाकरे यांनी नवनीत राणा यांना १४ दिवस तुरूंगात ठेवले. बारा तास कोठडीत उभे ठेवले. आपल्‍या देशात हनुमान चालिसा म्‍हणायची नाही, तर पाकिस्‍तानात जाऊन म्‍हणायची का, असा आपला उद्धव ठाकरेंना सवाल आहे.

आणखी वाचा-रश्मी बर्वे यांना दिलासा! जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती, मात्र…

फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्‍यावर देखील टीका केली. ते म्‍हणाले, आम्‍हाला हिंदू समाजाच्‍या शक्‍तीला संपवायचे आहे, असे राहुल गांधी म्‍हणतात. हिंदू समाजातील शक्‍ती म्‍हणजे काय, तर येथील अंबादेवी, दुर्गामाता ही हिंदू समाजाची शक्‍ती आहे. सर्व मातृशक्‍ती ही ख-या अर्थाने आम्‍ही शक्‍ती मानतो. ते या शक्‍तीला संपविण्‍याची भाषा करताहेत. पण तुमच्‍यासारखे किती आले आणि गेले, या शक्‍तीला कुणी संपवू शकले नाही. महाविकास आघाडी संपेल, पण आम्‍हाला कुणी संपवू शकत नाही, असे फडणवीस म्‍हणाले.