जंगलातील वाघांना आता सर्वसामान्य पर्यटकांचा कंटाळा आला असून नामांकित आणि ख्यातनाम व्यक्तींना त्यांनी व्याघ्रदर्शन घेण्यासाठी बोलावले आहे. त्यांचा उत्साह एवढय़ा पराकोटीला पोहोचला आहे की, हे दर्शन त्यांना पैसे देऊन नव्हे, तर फुकटात करवून घ्यायचे आहे, त्यामुळे व्याघ्र संवर्धनासाठी तडतड करणाऱ्या वन्यजीवतज्ज्ञांच्या आणि ज्या जंगलालगतच्या आदिवासींच्या भरवशावर हे व्याघ्र संवर्धन सुसह्य़ झाले आहे, त्या गावकऱ्यांच्या वर्तुळात मात्र तीव्र टीकेचे सूर उमटत आहेत.

राज्यातील पर्यटनात वाढ करण्याचा अफलातून पर्याय राज्य सरकारने शोधून काढला आहे. नामांकित आणि ख्यातनाम व्यक्तींना वनअतिथींचा दर्जा देऊन त्यांच्या तारांकित पर्यटनाचा संपूर्ण खर्च हे खाते सोसण्यासाठी तयार आहे. वास्तविक, विदर्भातील पाच व्याघ्र प्रकल्पांच्या भरवशावर राज्याचे जंगल पर्यटन आंतरराष्ट्रीय पटलावर पोहोचले आहे.

वास्तविक, या व्यक्ती स्वखर्चाने येण्याचा प्रकार गेल्या दोन वर्षांत वाढीस लागला आहे. असे असतानाही राज्याचे पर्यटन आणखी वाढवण्याची गरज राज्य सरकारला का पडावी, हे न उलगडणारे कोडे आहे. वाघांची संख्यावाढ आणि व्याघ्रदर्शनासाठी दशकभरापूर्वीपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या सहा-सात वर्षांंपासून वाघांची संख्याही वाढली आणि व्याघ्रदर्शनसुद्धा सुलभ झाले. आदिवासींनी प्रचंड नुकसान सहन करून वाघांना जागा करून दिली. यात त्यांचे राहते घर, जागा, उदरनिर्वाहाचे साधन असणारी शेती असे सर्व गेले. जंगलातील त्यांच्या अर्निबध वावरावर बंधने आली. वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्यांचे बळी केले. त्यांच्या गुराढोरांचे बळी गेले. ज्या आदिवासींच्या पुनर्वसनातून राज्याच्या वनखात्याला ‘अच्छे दिन’ आले, त्यांना बाजूला सारून आधीच ‘मार्केटिंग’ झालेल्या व्याघ्रदर्शनाचे पुन्हा ‘मार्केटिंग’ करण्याचा घाट घातला.

नामांकित आणि ख्यातनाम व्यक्तींच्या स्वागत, परिवहन, निवास आणि भोजनाची व्यवस्था वनखात्यामार्फत केली जाणार आहे. यासंदर्भात होणारा खर्च वनखात्याच्या विविध कार्यालयांसाठी आणि वनविभागाअंतर्गत मंडळे, महामंडळे यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कार्यालयीन व अन्य सुयोग्य अशा लेखाशीर्षकाअंतर्गत तरतूदीतून भागविण्यात येणार आहे.

मुळात या सर्व ठिकाणी येणारा पैसा हा सर्वसामान्य पर्यटकांचा पैसा आहे. त्यातील ८० टक्के पैसा हा आदिवासींसाठी खर्च केला जातो, पण आता मात्र ते या पैशाला मुकणार आहेत. नामांकित आणि ख्यातनाम व्यक्तींवर हा पैसा उधळला जाणार आहे.

वनखात्याची धावपळ अनाकलनीय

वनखात्याकडे जर एवढा पैसा जमा झाला आहे, तर त्याचा उपयोग करण्यासाठी वनखात्याकडे इतरही कामे आहेत. हा सर्व पैसा पर्यटकांच्या खिशातून येत आहे, तेव्हा त्याचा खर्चही पाणवठे, जंगल वाचवण्यासाठी होणे गरजेचे आहे. एकीकडे जंगलक्षेत्र कमी होत असताना पैशाची ही उधळण ‘सेलिब्रिटीं’वर का? विदर्भातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात आता पर्यटन नियंत्रित करण्याची क्षमता नाही, एवढे पर्यटन वाढले आहे. अशावेळी ‘सेलिब्रिटीं’सोबत वावरण्याची, त्यांच्यासोबत छायाचित्रे काढून घेण्याची वनखात्याची ही धावपळ न समजून येणारी आहे.

-देबी गोएंका, विश्वस्त, कन्झर्वेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट

डाअशी योजना आखण्यापूर्वी राज्य सरकारने एकदाही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा, वाघांसाठी नुकसान सहन करणाऱ्या आदिवासींचा विचार का केला नाही? स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून आज या विद्यार्थ्यांना व्याघ्र संवर्धनाचे धडे दिले जातात. शेकडो बंधारे या विद्यार्थ्यांनी बांधले असून स्वच्छता मोहीम जंगलालगतच्या गावात सातत्याने राबवली जात आहेत. या विद्यार्थ्यांकडून जंगलभ्रमंतीकरिता पैसे आकारले जातात. आदिवासींना जंगलाबाहेर काढून अशा व्यक्तींना जंगलभ्रमंतीचा आनंद देतात. मुळातच विदर्भातील व्याघ्रदर्शन जगाच्या नकाशावर पोहोचले असताना पैशाची ही उधळण कदापिही योग्य नाही.

 – किशोर रिठे, माजी सदस्य, केंद्रीय वन्यजीव मंडळ