लोकसत्ता टीम

अकोला : सूर्याचे स्थळ दररोज किंचित बदलत असते. काही दिवसांच्या फरकाने हा बदल आपल्या लक्षात येतो. शनिवार, २१ डिसेंबरला सूर्य पृथ्वीच्या मकर वृत्तावर येईल. त्यामुळे या दिवशी आपल्या भागात सर्वांत लहान दिवस पावणे अकरा तासांचा व रात्र सव्वा तेरा तासांची राहणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.

दररोज पूर्वेस उगवणारा सूर्य निश्चित पूर्वेला वर्षातील फक्त विषुवदिनी उगवतो. नंतर सूर्य स्थळ नेहमी बदलत असतो. काही दिवसांच्या फरकाने हा बदल आपल्या लक्षात येतो. पृथ्वीचा अक्ष भ्रमण कक्षेशी २३.५ अंशांनी कलून फिरत असल्याने दोन्ही गोलार्धात दिनमान कमी अधिक होते. २१ मार्च व २२ सप्टेंबर या वसंत व शरद संपातदिनी दिवस रात्र समान होतात. २१ जून आणि २१ डिसेंबर या अयनदिनी सूर्य अनुक्रमे कर्कवृत्त व मकरवृत्तावर येत असतो, असे दोड यांनी सांगितले.

आणखी वाचा-आता गणवेश शाळांमार्फतच, शैक्षणिक सत्र सुरू होताच ४५ लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

२१ डिसेंबरला सूर्य नेमका मकरवृत्तावर असेल व नंतर सूर्याचे उत्तरेकडे सरकणे सुरू होणे हाच उत्तरायणाचा प्रारंभ असतो. यावेळी दक्षिण गोलार्धात तापमान अधिक असल्याने उन्हाळा व उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. आपल्या भागात यावेळी दिवस सर्वात लहान सुमारे पावणे अकरा तासांचा तर रात्र सव्वा तेरा तासांची असेल. यापुढे दिनमान वाढायला लागून त्याचा फरक मकरसंक्रांतीपासून जाणवतो, असे प्रभाकर दोड म्हणाले.

बहरलेल्या आकाशात विविध तारकांचे दर्शन

सध्या सुरू असलेल्या मोठ्या रात्रीचा काही वेळ आकाश बघण्यात घालून बहरलेल्या आकाशात विविध तारकांसह पश्चिमेस शुक्राची तेजस्वी चांदणी, पूर्वेला गुरू ग्रह व आकाश मध्याशी वलयांकित शनी ग्रह तर रात्री नऊ नंतर पूर्वेस मंगळ व पहाटे बुध ग्रह बघण्याचा अनोखा योग जुळून आला आहे. आकाशातील या अभूतभूर्व दृश्याचा आनंद घेण्याचे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले आहे.

आणखी वाचा-संमेलनस्थळाला गोडसेचे नाव देण्यासाठी धमक्या, साहित्य संमेलन आयोजक संस्थेचे संजय नहार यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवार, २१ डिसेंबरला सूर्य नेमका मकर वृत्तावर असल्याने आपल्या भागात दिवस लहान केवळ १० तास ४८ मिनिटे व रात्र सर्वात मोठी अर्थात १३ तास १२ मिनिटांची असेल. उत्तरायणाच्या सुरुवातीला आकाशात विविध ग्रह तारे बघण्याचा योग सुद्धा जुळून आला आहे. अवकाश प्रेमींसाठी ही पर्वणी ठरेल. -प्रभाकर दोड, प्रमुख, विश्वभारती केंद्र.