चंद्रपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शासनाच्या एकाही मंत्र्याने, प्रतिनिधीने उपोषण मंडपाला भेट न दिल्याने तसेच मागण्यांची पूर्तता न केल्याने राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असा अशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला. दरम्यान रविवारी निघालेल्या ओबीसींच्या मोर्चात २० संघटनांसह हजारों ओबीसींचा जनसागर सहभागी झाला होता.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात दुपारी एक वाजता गांधी चौकातून ओबीसींचा भव्य मोर्चा निघाला. या मोर्चात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार ॲड. अभिजित वंजारी, आमदार किशोर जोरगेवार, बबनराव तायवाडे, माजी मंत्री परिणय फुके, भाजपा नेते आशिष देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य सहभागी झाले होते.
ओबीसी समाज व इतर समाजाची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी समाजाचे वसतिगृह तत्काळ सुरू करा व मराठा समाजाला सरसकट ओबीसी वर्गात सामील करू नये व बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावे. आधीच ओबीसी (विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल ४२३ च्या वर जाती आहेत. त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही, तेव्हा मराठा समाजाचा सहभाग ओबीसीत करू नये अशीही मागणी लावून धरण्यात आली आहे.
आज निघालेल्या मोर्चात ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, ॲड. पुरुषोत्तम सातपुते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ अशोक जीवतोडे ,कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, विनायक बांगडे, माजी नगरसेवक नंदू नागरकर, प्रदीप देशमुख, प्रा अनिल शिंदे, रमेश राजुरकर, देवराव भोंगळे, राहुल पावडे, संदिप गिऱ्हे, नितीन भटारकर, सुनिता लोढीया, बळीराज धोटे, विदर्भ तेली महासंघचे सूर्यकांत खनके, ॲड. दत्ता हजारे, डॉ.संजय घाटे, अनिल डहाके, मनिषा बोबडे, अजय वैरागड, कुणाल चहारे, सतिश वारजूकर यांच्यासह महिला, युवक, युवती, विद्यार्थी, ओबीसी समाजातील विविध घटक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी यांना ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान उपोषण आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी दिला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व स्थानिक मंत्र्यांची आंदोलनाकडे पाठ
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी विभागाचे मंत्री अतुल सावे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. ओबीसी जनता या सर्वांना धडा शिकविणार आहे, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
हेही वाचा – ‘एमपीएससी’ भरती : नवीन १७० जागांसाठी जाहिरात
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरचे रहिवासी असताना त्यांनी या अन्नत्याग आंदोलनाला पाठ दाखविली. निवडणुकीत त्यांना ओबीसींची मते हवी, मात्र ओबीसींच्या आंदोलनाला साधी भेट देण्याचे सौजन्य दाखविले नाही, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनीदेखील आंदोलनाला भेट दिली नाही. सर्वच वार ओबीसी नसतात, काही वार हेडगेवारदेखील असतात असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. ओबीसी जनता या सर्वांना धडा शिकवेल, असेही ते म्हणाले.