लोकसत्ता टीम
अकोला: जिल्ह्याला रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. बाळापूर तालुक्यातील पारस येथे समर्थ बाबूजी महाराज संस्थान मंदिराच्या छतावर एक मोठे वृक्ष उन्मळून पडले. यामध्ये ४० ते ५० जण दबले होते. त्यातील चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अनेक जण जखमी झाले आहेत.
जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. बाळापूर तालुक्यातील पारस गावात बाबूजी महाराज संस्थानामध्ये सायंकाळीची आरती सुरू होती. मंदिराला लागून असलेले मोठे कडुलिंबाचे झाड अचानक उन्मळून टिनशेडवर कोसळले. शेडखाली असलेले सर्व लोक दबले गेले. या घटनेत आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ४० ते ५० जण पूर्णपणे दबले होते.
आणखी वाचा-वाशीम जिल्ह्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा; जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ घोषित
पाऊस आणि वारा यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळा येत आहे. जेसीबी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. माहिती मिळताच बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.
