इस्लाम के भी संत की, कबरों में जा बैठा हूँ मै।

हिंदू धरम के संत के चरणों का रस लुटा हूँ मै।

कई ख्रिश्चन की भी सुनी गिरजाघरों में प्रार्थना।

कई बुद्ध स्थानों में भी मैने की प्रभू से वंदना!

हे प्रसिद्ध भजन आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे. ‘लहर की बरखा’ या त्यांच्या पुस्तकात समाविष्ट असलेले. ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडणारे राष्ट्रसंत सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारे होते. त्यांनी प्रबोधनासाठी धर्माचा व त्यातल्या त्यात हिंदू धर्माचा आधार घेतला कारण तेव्हाची ती गरज होती. त्याकाळचा समाज धार्मिक रूढी, परंपरांवर विश्वास ठेवणारा होता. त्याला तडा न जाऊ देता धर्माचा आधार घेत समाजाला अंधश्रद्धा व चुकीच्या परंपरांच्या जोखडातून बाहेर काढण्याचे काम महाराजांनी केले. त्यांच्या आधी हाच मार्ग गांधींनी अनुसरला. म्हणून आता त्यांना केवळ हिंदूचे संत असे लेबल लावणे बरोबर कसे ठरू शकेल? याच तुकडोजींनी १९६६ मध्ये भंडाऱ्यातील हाजी प्यारेमिया यांच्या विनंतीवरून अवलिया बाबा पहिलवानच्या मजारीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी सर्व धर्माचे मूळ मानवधर्मात आहे असे ठासून सांगितले. प्रमोद मुनघाटे यांनी साहित्य अकादेमीसाठी लिहिलेल्या पुस्तकात या भेटीची रंजक हकीकत नमूद केली आहे. प्रा. रघुनाथ कडवे यांनी लिहिलेल्या तुकडोजींच्या चरित्रपटात ते सर्व धर्मांना समान न्याय देणारे कसे होते हेच दिसते. त्यांचा वर्षनिहाय जीवनपट चाळला तर १९६४ व १९६६ या दोनच वर्षात त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या संमेलनांना हजेरी लावली. बाकीचा त्यांचा सारा कार्यकाळ गांधी विचाराचे गुण गात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेत गेला. केवळ या दोन भेटीवरून त्यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा आटापिटा अलीकडे वाढला आहे. ही पार्श्वभूमी कथन केली ती त्यासाठी. आता या विषयाला हात घालण्याचे कारण जरा वेगळेच. अलीकडच्या दहा वर्षात सत्तेत आलेला उजवा विचार स्वातंत्र्यलढ्यातला नाकर्तेपणा लपवण्यासाठी राष्ट्रपुरुषांना स्वत:च्या विचाराच्या कवेत घेण्यासाठी धडपडू लागला. सरदार पटेल व तुकडोजी ही त्यातली प्रमुख नावे. हा विचार जोपासणाऱ्यांनी तेव्हाची राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आता काय करावे हा त्यांचा प्रश्न. त्यात फार नाक खुपसण्याचे काही कारण नाही. मात्र या राष्ट्रपुरुषांना आपलेच म्हणून तुम्ही स्वीकारत असाल तर त्यांच्या पूर्ण विचार व कृतीसह स्वीकारा ना! प्रश्न निर्माण होतो तो इथे.

हे द्रष्टे नेते वा संत आमचेच असे एकीकडे म्हणायचे व दुसरीकडे त्यांचे सोयीचे तेवढे विचार समाजासमोर आणायचे हा कोतेपणा झाला. नेमके त्याचेच दर्शन आज घडते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत सुद्धा हा उजवा प्रवाह तेच करत आलाय. त्यांच्या विज्ञानवादी विचाराला व गाय हा पशू आहे या वक्तव्याला हात लावण्याची हिंमत या प्रवाहात नाही. तर आता मुद्दा राष्ट्रसंतांचा. येथील नागपूर विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले. या नामकरणासाठी सर्वाधिक धडपड केली ती भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांनी. तेव्हा सत्तेत नसताना सुद्धा त्यांनी सरकारकडून हा निर्णय करवून घेतला. त्यालाही आता बरीच वर्षे झाली. नामकरणानंतरच्या काळात नेमके काय घडले? हे विद्यापीठ खरोखर या राष्ट्रसंतांच्या विचारावर चालू लागले का? किमान त्यांची दखल घ्यावी असे किती कार्यक्रम विद्यापीठात होतात? येथे स्थापन करण्यात आलेल्या तुकडोजी महाराज अध्यासनाची नेमकी स्थिती काय? याची उत्तरे शोधायला गेले की साऱ्या नकारात्मक गोष्टी तेवढ्या समोर येतात. हे प्रश्न पुन्हा विचारण्याचे कारण नुकत्याच त्यांच्या पार पडलेल्या जयंती कार्यक्रमात दडलेले. विद्यापीठ प्रशासनाने यावेळी ही जयंती अक्षरश: उरकली. राष्ट्रसंतावर अभ्यास असलेला ना कुणी वक्ता बोलावला गेला, ना कुणा तज्ज्ञाचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. रांगोळी व भजन स्पर्धा तेवढी घेतली गेली. गेल्या अनेक वर्षांपासून या विद्यापीठात हेच घडते आहे. दोन वर्षापूर्वी तर याच जयंतीच्या निमित्ताने एका हिंदू धर्मप्रसारकाचे व्याख्यान ठेवले गेले. इतर महापुरुषांच्या जयंती व पुण्यातिथी कार्यक्रमासाठी लाखोचा खर्च करणारे हे विद्यापीठ तुकडोजींच्या बाबतीत मात्र कोतेपणा दाखवते. अलीकडे सर्व महापुरुषांची जातीत विभागणी झालेली. तुकडोजी महाराज त्यातही बसणारे नाहीत. त्यांचा सेवक व शिष्यवर्ग विदर्भभर पसरलेला असला तरी त्याचे स्वरूप सर्वधर्म व जातीय. त्यामुळे या राष्ट्रसंतासाठी पुढाकार कुणी घ्यायचा असा प्रश्न या विद्यापीठातील धुरिणांना कदाचित पडत असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नामकरणानंतर तुकडोजींच्या विचारावर आधारलेली काही पुस्तके सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमात असावी. विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेताना त्यावर आधारलेले काही प्रश्न असावेत असे या विद्यापीठातील काहींना वाटले पण तोही प्रस्ताव बारगळला. याला केवळ उजवा विचारच कारणीभूत होता असे नाही तर महाराजांच्या अनुयायांमध्येही यावरून फूट पडलेली अनुभवायला मिळाली. तरीही प्रशासनाला हा मुद्दा रेटता आला असता पण नंतर उजव्यांचा प्राधान्यक्रमच बदलल्याने तो मागे पडला. सेवाग्राम या गांधींनी वसवलेल्या गावातील वैद्यकीय महाविद्यालयात आजही प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकाला गांधी विचाराची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. हा आदर्श समोर असूनसुद्धा येथील विद्यापीठ ढिम्म राहिले. ही उदासीनता तुकडोजी महाराजांच्या विचारांचाच अपमान करणारी आहे. विद्यापीठात त्यांच्या विचाराच्या अध्यासनाची अवस्था सुद्धा वाईट. सारा कारभार प्रभारींच्या बळावर. त्यामुळे विद्यार्थीसंख्या कमी. ते बंद पडू नये यासाठी कसेबसे चालू ठवेलेले. ही बेफिकरी नेमके काय दर्शवते? तुकडोजी महाराजांनी सांगितलेली ग्रामस्वराज्याची संकल्पना आजही समर्पक. वाढत्या शहरीकरणामुळे खेडी ओस पडू लागली असताना पुन्हा खेड्याकडे चला असे शिक्षण देणे गरजेचे. जोवर खेडी सशक्त होत नाही तोवर भारत बलशाली होणार नाही असे सर्वच नेते सांगतात. तरीही या विद्यापीठाला राष्ट्रसंतांचा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावा असे वाटत नसेल तर त्याला काय म्हणावे? प्रबोधन हा तुकडोजींच्या विचाराचा आत्मा होता. ते करायचे असेल तर शिक्षणासारखे दुसरे माध्यम नाही. याची जाणीव अजूनही या विद्यापीठाला होत नसेल व त्याचे धुरिण महाराजांना हिंदुत्ववादाची झालर चढवण्यात व्यग्र असतील तर तो या राष्ट्रसंताच्या विचाराचा पराभव ठरतो. तेच काम सध्या या शैक्षणिक संकुलात सुरू आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, मानवता व करुणा ही मूल्ये सर्व धर्माचा सार आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ग्रामगीतेत सर्व धर्मग्रंथांचा गौरव केला. नेमका तोच विचार बाजूला सारून त्यांच्या दोन भेटीला प्रमुख मुद्दा करत अपुरा विचार लोकांसमोेर आणणे ही विकृती आहे. ते करत असतानाच त्यांच्या स्मरणाकडे कायम दुर्लक्ष करणे ही महाविकृती. या दोन्हीचे धनी हे विद्यापीठ ठरले आहे.