पाणी प्रश्नावरून उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या अकोला-नागपूर संघर्ष पदयात्रेला प्रारंभ

खारपाणपट्यातील गावासाठी नियोजित ६९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला राज्य सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात आजपासून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून टँकरमधील खाऱ्या पाण्यासह अकोला-नागपूर संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात निघालेली ही यात्रा उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी धडकणार आहे. हे खारे पाणी पिण्याची आणि त्याच पाण्याने अंघोळ करण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांना ग्रामस्थ व शिवसैनिक करणार आहेत.

हेही वाचा >>>मालमत्ता करात सूट न दिल्यास पलावातील रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा

खारपाणपट्ट्यात गोड पाण्याचे स्त्रोत नसल्याने ग्रामस्थांना खारे पाणी प्यावे लागते. ग्रामस्थांना गोड पाण्याची व्यवस्था होण्यासाठी ६९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. ६९ गावे पाणी पुरवठा योजनेसाठी वान प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यात आले. ४३ कि.मी. अंतरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे नियोजन आहे. त्यापैकी २७ कि.मी. अंतरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. २१९ कोटींच्या या योजनेवर आतापर्यंत १२५ कोटींचा खर्च झाला असून, ९२ कोटी रुपये कंत्राटदाराला अदाही करण्यात आले आहेत. दरम्यान, तेल्हारा तालुक्यातून या योजनेला विरोध झाला. तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह आमदार प्रकाश भारसाकळे यांनी योजनेला स्थगिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी पाणीपुरवठा योजनेला स्थगित ठेवण्याचा आदेश दिला. पाण्यावरून वातावरण तापले आहे. या विरोधात आ. देशमुख यांनी विधिमंडळाच्या परिसरात उपोषण आंदोलन देखील केले.

हेही वाचा >>>वर्धा : गैरसमज नको, नागपूरच्या वज्रमूठ सभेसाठी सर्वाधिक कार्यकर्ते आर्वीतूनच जाणार; अमर काळेंचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थगितीला निषेध करण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेकडून ग्रामस्थांना घेऊन अकोला ते उपमुख्यमंत्री राहत असलेल्या नागपूरपर्यंत संघर्ष पदयात्रेला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. शहरातील राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करून यात्रेला प्रारंभ झाला. जयहिंद चौक, शहर कोतवाली, गांधी चौक, मदनलाल धिंग्रा चौक, टॉवर चौक, रतनलाल प्लॉट, जठारपेठ, उमरी, गुडधीमार्गे घुसकडे यात्रा रवाना झाली. नागपूरपर्यंत ९ ठिकाणी यात्रेचा मुक्काम राहणार आहे. २१ एप्रिलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी यात्रा पोहोचणार आहे. त्याठिकाणी खारे पाणी फडणवीस यांना देण्यात येईल, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले.