नागपूर : विदर्भातील नागरिकांनी आपल्या प्रदेशाचा विकास आपणच कसे करू शकतो, यावर लक्ष केंद्रित करावे आणि उद्योजक घडवण्यासाठी पुढे यावे. कोणीतरी मोठा उद्योगपती बाहेरून येईल आणि विदर्भाचा विकास करेल, या मानसिकतेतून बाहेर पडावे, असे आवाहन विदर्भ इकॉनामिक डेव्हलपमेंटचे (वेद) संस्थापक सचिव विलास काळे यांनी केले.

‘वेद’च्या स्थापनेला ३० वर्षे झाली. त्यानिमित्ताने ‘वेद’च्या अध्यक्ष रिना सिन्हा आणि विलास काळे यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ‘वेद’च्या स्थापनेचे उद्दिष्ट आणि गेल्या ३० वर्षांतील कार्याबाबत माहिती दिली. विलास काळे म्हणाले, १९७० साली पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक विकास आणि सिंचन प्रकल्प पूर्ण होत होती तर विदर्भात मात्र त्या तुलनेत काहीच नव्हते. विदर्भात मँगनीज, कोळसा, वनसंपदा आहे. या तिन्हीचे राष्ट्रीकरण झाले. कापसात एकाधिकारशाही आली. त्यामुळे लोकांमध्ये, उद्योजकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर ‘वेद’चे संस्थापक अध्यक्ष गोविंद डागा यांनी एक विचार मांडला. आपण सरकारला दोष देतो, पण स्वत: त्यासाठी प्रयत्न का करीत नाही? डागा यांच्या विचारातून स्वयंसेवी संस्था स्थापन करण्याची संकल्पना पुढे आली. विदर्भ इकॉनामिक डेव्हलपमेंट स्थापन करण्याचा निर्णय झाला. ही संस्था कोणत्याही एका क्षेत्रासाठी नाही तर विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे.

या संस्थेची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. संस्थेचा सदस्य आपल्या वैयक्तिक कामासाठी या संस्थेचा वापर करत नाही आणि दुसरे म्हणजे ही संस्था अराजकीय आहे. कारण, विदर्भाचा विकास करायचा असेल तर सर्वच राजकीय पक्षांचे योगदान हवे आहे. संस्थेच्या या धोरणामुळे सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर संस्थेची ‘थिंक टँक’ बनवण्यात आली. विदर्भाची वेगाने प्रगती करायची असेल तर काय काय हवे, यासंदर्भात विचार झाला आणि १० प्रमुख क्षेत्र निवडण्यात आले. यामध्ये मिहान, नागपूर-मुंबई सुपर एक्सप्रेस-वे, पर्यटन, सिंचन प्रकल्प, खाणी क्षेत्र, शिक्षण, आरोग्य, संत्री, कापूस यांचा समावेश होता. या क्षेत्राचा अभ्यास करून करून राज्य सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा केला. आज ३० वर्षानंतर मिहान प्रकल्पाने वेग घेतला आहे. एक्सप्रेस-वे तयार झाला आहे. ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटक वाढले आहेत. त्यामुळे थोडे समाधान आहे. परंतु अजूनही बरेच काही करायचे राहिले आहे, असे काळे म्हणाले.

विदर्भ स्वतंत्र राज्य व्हावे

महाराष्ट्र राज्य प्रशासकीयदृष्ट्या खूप मोठे आहे. विदर्भात नैसर्गिक, खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पाणी देखील मुबलक आहे. या प्रदेशाचा सर्वांगीण विकास वेगाने होण्यासाठी विदर्भ वेगळा होणे आवश्यक आहे, असेही काळे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उच्च शिक्षणावर ‘वेद’चा भर

‘वेद’ने उच्च शिक्षणावर भर दिला. त्यामुळे नागपुरात एम्स, आयआयएम सारख्या शैक्षणिक संस्था आल्या. राज्य सरकारला आणखी १५ विद्यापीठांची शिफारस केली आहे. तसेच मिहान-सेझमध्ये आयआयएफटी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती ‘वेद’च्या अध्यक्ष रिना सिन्हा यांनी दिली. ‘विदर्भ २०३०’ व्हिजन डाक्युमेंट तयार करण्यात आले आहे. यामुळे विदर्भात शाश्वत आणि समावेशी आर्थिक विकासाला चालना मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रकल्प कौशिक आणि वाघ उत्सव यासारखे उपक्रम राबवण्यात येतील, असेही सिन्हा म्हणाल्या.