वर्धा : जिल्ह्यात अनेक इमारती ब्रिटिश काळातील आहेत. जीर्ण स्थितीत असलेल्या या इमारतीत मात्र आजही शासकीय कामकाज चालते. विशेषकरून पोलीस ठाण्याच्या इमारती अश्या स्वरूपात आहेत. त्या पाडणे गरजेचे असल्याचे नेहमी बोलल्या जाते. अखेर काहीसाठी मुहूर्त अखेर निघाला.
गुन्हेगारीचा वाढता क्रम व त्या तुलनेत पोलिस ठाण्याची अपुरी पडणारी इमारत यामुळे अधिकारी व कर्मचा-यांना काम करताना येणारी अडचण लक्षात घेऊन आता जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या इमारतीची आधुनिक पद्धतीने निर्मिती करण्यासाठी गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला आहे. हिंगणघाट व आर्वी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीची निर्मिती लवकर केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली. या दोन्ही ठाण्याची इमारत बांधकामासाठी १२ कोटी ५४ लक्ष ३८ हजार ४१५ रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मागील काही वर्षात हिंगणघाट व आर्वी शहर व परिसराचे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. या दोन्ही शहरासोबतच ठाण्याच्या कार्य क्षेत्रात ग्रामीण भागाचा समावेश असल्याने पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात गुन्हयांचे देखील प्रमाण वाढले आहे. दोन्ही शहरातील पोलिस ठाण्याची निर्मिती अनेक वर्षांपुर्वी करण्यात आली आहे. ठाण्याची इमारत देखील जुनी असल्याने कामकाज करताना अपुरी जागा व सुविधांची अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अधिक लोकसंख्या असलेल्या या दोन्ही पोलिस ठाण्याची नवीन इमारत आधुनिकपद्धतीने निर्माण करण्याची गरज निर्माण झाली होती. जिल्ह्याला अनेक वर्षानंतर पालकमंत्री पदासोबतच गृह राज्यमंत्री पद मिळाले. त्याचा लाभ होत असल्याचे दिसून येत आहे. गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा मजबुत करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आर्वी व हिंगणघाट ठाण्याच्या नवीन इमारतीची आधुनिक निर्मिती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रशासकीय सेवेतील अनेक इमारती ब्रिटीश काळातील असून त्या आज घडीला मोडकळीस आल्या आहे. पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत देखील ब्रिटीश काळातील होती. या दोन्ही मोडकळीस आलेल्या इमारती कालबाह्य करण्यात येऊन जिल्हाधिकारी प पोलिस अधीक्षक कार्यालयाची सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. वर्धा शहर पोलिस ठाण्याची इमारत जीर्ण झाल्याने ती तोडून सुसज्ज अशी इमारत तीन वर्षांपुर्वी निर्माण करण्यात आली आहे. जिल्हयातील आर्वी, हिंगणघाट सह अन्य पोलिस ठाण्याच्या इमारती देखील ब-याच जुन्या आहे. आज घडीला या इमारती मोडकळीस आल्या आहे.
हिंगणघाट पोलिस ठाण्याची इमारत ब्रिटीश काळात निर्माण करण्यात आली आहे. तथापि, ही इमारत आज घडीला अपुरी असून सोईसुविधांची देखील कमतरता आहे. शहराचा मोठया प्रमाणत विस्तार झाला असून ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जवळपास ६० गावांचा देखील समावेश आहे. वाढती गुन्हेगारी व अपुरी जागा यामुळे यंत्रणेवर ताण वाढत असल्याने पोलिस ठाण्याच्या इमारतीचे आधुनिकीकरण करण्याची गरज निर्माण झाली होती. हिंगणघाट शहरातील जागेवर पोलिस ठाणे व एसडीपीओ कार्यालयाची सुसज्ज नवीन इमारती निर्माण करण्यात येणार आहे. सोळाशे स्केअर मीटर जागेत ही इमारत होणार आहे. ८२८ स्क्वेअर मीटरचा तळमजला व ७७८ स्के. मीटरच पहिला मजला राहणार आहे. बांधकामावर ६ कोटी १० लक्ष १४ हजार रूपये खर्च करण्यात येणार आहे.
आर्वी पोलिस ठाण्याची इमारतसुद्धा ब्रिटीश काळातील आहे. ही इमारत मोडकळीस आल्याने नवीन इमारत निर्माण करणे आवश्यक झाले होते. आर्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६० गावांचा समावेश आहे. वाढती गुन्हेगारी व अपुरी जागा हा प्रश्न देखील येथे निर्माण झाला होता. त्यामुळे ठाण्याची सुसज्ज इमारत आवश्यक झाली होती.म्हणून नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. एकूण १ हजार ५०० स्के. मीटर क्षेत्रात इमारत होणार आहे. तळमजला ८०२ स्के.मी व पहिला मजला ७७० स्के. मीटरचा राहणार आहे. या बांधकामावर ६ कोटी ४४ लक्ष २३ हजार रूपये खर्च होणार आहे.
नवीन पोलिस ठाण्याच्या इमारतीमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध राहणार आहे. पोलिस यंत्रणेवरील कामाचा व्याप बघता त्या दृष्टिने सुविधा देण्यात येणार आहे. अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र कक्ष, लॉक व पीसीआर रूम, रेकॉर्ड रूम, स्त्री व पुरूषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, पाण्याची व्यवस्था, अभ्यागतांसाठी स्वतंत्र कक्ष, सोलर पॅनल व अन्य महत्वपूर्ण सुविधा राहणार आहे.