वर्धा : अभिनव आंदोलने हे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे अफलातून शस्त्र राहले. अशी लक्षवेधी आंदोलने करीत ते लोकप्रिय झाल्याचे म्हटल्या जाते. त्यांचाच कित्ता त्यांच्या प्रहार संघटनेच्या काहींनी अंमलात आणला. आर्वीचे बाळा जगताप हे त्यापैकीच एक. त्यांनी पण शेतकरी व अन्य समस्यावर अभिनव आंदोलने केलीत. त्याची चांगलीच चर्चा पण झाली आहे. आता आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांना जगताप यांनी पाठिंबा दिला. त्यासाठी ते व त्यांचे सहकारी चर्चेत आहे.
शेतकरी कर्जमाफीसह संबंधित १७ मागण्यांसाठी मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आर्वी येथे शेतकऱ्यांनी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात अभिनव आंदोलन केले. शासन प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे आता फक्त आम्हा शेतकऱ्यांच्या अंगावर कपडे शिल्लक राहिले आहे. आता ते पण तुम्ही घेऊन घ्या अशा शब्दात बाळा जगताप यांनी आपल्या भावना तहसील कार्यालय आर्वी येथे तहसीलदार यांच्या समक्ष मांडल्या . बाळा जगताप यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी आपले सुद्धा कपडे प्रशासनाच्या स्वाधीन केले. असे निषेधात्मक पवित्रे घेत बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन जाहीर केले.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी. दिव्यांग व विधवा महिलांना ६००० रुपये मानधन. हमीभावावर २०% अनुदान. ०७ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे. तरुणांच्या हाताला काम व योग्य दाम देण्यात यावे. रोजगार भरती करण्यात यावी. शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांना सुद्धा आर्थिक सहाय्य देण्यात यावे. शेतमजुरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे. शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा घरकुलाला ५ लाख अनुदान देण्यात यावे. मेंढपाळ, मच्छीमार , ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अशा एकूण १७ मागण्यांचे समर्थन करण्याकरिता आज तहसील कार्यालय आर्वी येथे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
यावेळी जगताप यांच्यासह सुधीर जाचक, विक्रम भगत, संजय कुरिल,कुणाल चव्हाण, राजेश आगरकर, गुड्डू पठाण, अबरार खान, शेख जफर, अब्दुल राहिल, शेख कलीम, अंकुश गोटेफोडे, प्रवीण वाघ, प्रफुल कुंबोत, मंगेश कोल्हे, धीरज गिरडकर, राजू देऊळकर, किरण लोखंडे, शेख इकबाल यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. आता आमचे हे आंदोलन प्रशासनास जाग आणणारे ठरेल, अशी अपेक्षा बाळा जगताप यांनी व्यक्त केली.