नागपूर : राज्याच्या हवामानात पुन्हा बदल अपेक्षित आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे बदल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, तापमानात देखील मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतील. काही ठिकाणी तापमान अधिक तर काही ठिकाणी ते कमी झालेले दिसून येईल.

बंगालच्या उपसागरात येत्या ४८ तासात चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक शहरात सध्या रात्री ते पहाटेदरम्यान गारवा जाणवत आहे. दुपारी मात्र उकाडा कायम आहे. नागपूर शहरातही रात्रीच्या तापमानासह दिवसाच्या तापमानात हळूहळू घट होत आहे. तर पहाटेच्या सुमारास धुक्यांची हलकी चादर देखील दिसून येत आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण, खान्देश, मराठवाड्यातील काही शहरांमध्येही हीच स्थिती आहे. राज्यात दिवाळीनंतर तापमानात हळूहळू का होईना घट होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लोकांच्या अंगावर गरम कपडे दिसू लागतील. काही ठिकाणी मात्र रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहे. मात्र, हिवाळ्यातील थंडीची प्रतीक्षा अजूनही कायम आहे.

हे ही वाचा… थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”

हे ही वाचा… “हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार १५ नोव्हेंबरनंतर थंडी वाढण्याची शक्यता आहे. जळगाव, पुणे, सांगली, नागपूर, नाशिक आदी जिल्ह्यात तापमान घसरले आहे. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात थंडी जाणवेल. दरम्यान, आज तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या दिवसाचे तापमान अजूनही ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. राज्यातील तापमानात चढउतार सुरूच राहणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर तामिळनाडू व केरळच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व राजस्थान भागात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सियसने घट झाली आहे. वातावरणात बदल होत असल्याने आरोग्याच्या तक्रारीही वाढू शकतात, त्यामुळे या काळात आरोग्याची विशेष काळजी घेण्यात यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सध्या कुठे थंडी तर कुठे उष्णता असे वातावरण दिसून येत आहे. एरवी दसऱ्यानंतरच थंडीला सुरुवात होते. यावेळी मात्र थंडीची सुरुवात उशिरा झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत थंडी लांबण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.