नागपूर : सौरभ पिंपळकर हा भाजपाचा कार्यकर्ता आहे, परंतु त्याने कुठलीही धमकी दिली नाही, तर मजकूर फेसबुकवरून केवळ फॉरवर्ड केला. त्याचे समर्थन भाजपा करणार नाही. पोलीस त्याची चौकशी करत आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या गटातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्या वाईट आणि घाणेरड्या पद्धतीने ट्विटच्या माध्यमातून वैयक्तिक टीका केली त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांना कोणीही धमकी देणे चुकीचे आहे. सौरभ पिंपळकर हा भाजपाचा कार्यकर्ता आहे, मात्र त्याने फेसबुकवर आलेला संदेश ट्विटच्या माध्यमातून फॉरवर्ड केला ते चूक आहे आणि त्याचे आम्ही समर्थन करत नाही. मुळात सौरभने शरद पवार यांना धमकी दिलेली नाही. पोलीस त्याची चौकशी करतील. आम्ही माहिती घेऊन चौकशी करू आणि खरंच दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. मात्र गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या घाणेरड्या शब्दांत उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून टीका केली जात होती त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे. हेही वाचा - “पालकमंत्री मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे की फक्त बल्लारपूर मतदारसंघाचे? जनता संभ्रमित”, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटेंचा सवाल उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढली तरी शरद पवार आणि सोनिया गांधी उद्धव ठाकरे यांना सांगतील, तुम्हाला आम्ही केवळ दोन जागा देतो. उद्धव ठाकरे त्यालाही होकार देतील, अशी स्थिती त्यांची झाली आहे. त्यांना महाविकास आघाडीमध्ये फारशी किमत नाही, असेही बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता काही नेते लंडनला जाऊन आराम करतात. अजूनही महाराष्ट्रात परतले नाहीत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांसाठी बाहेर गेले तर त्यांच्यावर टीका केली जाते. मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांनी आपल्या परिवाराला वेळ देऊ नये का, असा सवाल बावनकुळे यांनी केला.