चंद्रपूर : निजामकालीन वस्ती असलेल्या महाराष्ट्र-तेलंगाना सीमेवरील जिवती तालुक्यातील ‘घोडनकप्पी’ ग्रामस्थांची मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकतील काय? असा प्रश्न आदिवासींना पडला आहे. त्याचे कारण आहे, ना गावात जायला रस्ता, ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. पुन्हा किती वर्षे खाटेवर उचलून नेवून उपचार करायचे? मुले पुन्हा किती दिवस डोंगर चढून शाळेत जातील? आम्हाला आमच्या मुलभूत सुविधा, हक्क द्या, असा टाहो आदिम कोलाम व राजगोंड समुदाय असलेले गावकरी फोडताहेत.

निजामकालीन वस्ती असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील कोलाम, आदिवासी समूदाय असलेले गाव. चारही बाजूने निसर्गरम्य डोगरांने वेढलेल्या या कोलाम गुड्यात शासनाच्या विकासाची किरणे पोहोचली नाही. गावात जायला ना रस्ता आहे, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. ना आरोग्य सुविधा आहे; ना दळणवळणाची साधने. डोंगरातील कोलाम आदिवासींच्या ‘घोडनकप्पीत’ विकासाचा सूर्य उगवणार तरी कधी? हा प्रश्न येथील गावकरी उपस्थित करीत आहे.

हेही वाचा – “भाजपा म्हणजे पाकिटमार”, नाना पटोलेंचा घणाघात, म्हणाले, “जी-२० साठी केलेल्या रोषणाईची सर्वसामान्यांच्या विजेच्या देयकातून वसुली”

ग्रामसभा काय, लोकप्रतिनिधी कोण, याचीही माहिती नाही..

आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील भारी गटग्रामपंचायतअंतर्गत घोडनकप्पी हे दोन कोलाम व गोंड समुदायाचे गुडे आहेत. १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत निजामाच्या आधिपत्याखाली असलेल्या या गुड्यांचा आजही विकास नाही. ग्रामसभा म्हणजे काय? आमदार कोण? खासदार कोण? मंत्री कोण? अशा अनेक प्रश्नांपासून येथील नागरिक अनभिज्ञ आहेत. केवळ मतदानापुरते येथील नागरिकांचा वापर लोकप्रतिनिधी करत असल्याचे दिसते. मात्र तरीही येथील नागरिकांची साधी तक्रार नाही.

बांधलेल्या घरांना आग लागली आणि भूकेपोटी गावाने घराची पत्रे विकली..

घोडनकप्पी हे गाव दोन भागात विभागले आहे. एक डोंगरावर व एक डोंगराच्या खाली. येथे राजगोंड व कोलाम समुदायाची सध्या २५ घरे आहेत. तीसेक वर्षांपूर्वी या गावात तब्बल २०० घरे होती. १९९१-१९९२ साली हा भाग नक्षलग्रस्त असताना घोडणकप्पी गावाला आग लागून संपूर्ण गाव जळून खाक झाले. अत्र, वस्त्र, निवारा या तिन्ही गोष्टी निसर्गाने हिरवून घेतल्यानंतर पोटाची भूक भागविण्यासाठी संपूर्ण गाव अस्ताव्यस्त झाले. अनेकांनी गाव सोडले. कोण कुठे गेले याचे पुरावेही नाहीत. १९९४-१९९५ ला कोलाम शोधो मोहिमेअंतर्गत माजी आमदार वामनराव चटप यांनी गावापासून १ किमी अंतरावर टेकडीवर १६ घरे येथील कोलाम, आदिवासी बांधवांना बांधून दिली. परिस्थिती इथेच थांबली नाही. टेकडीवर पाण्याची व्यवस्था नसल्याने डोंगराच्या पायथ्याशी १ किमी खाली उतरून तहान भागवावी लागत होती. दिवसे लोटत गेली. भुके पोटी टेकडीवरील घराची पत्रे, सामान विकून येथील नागरिकांनी मूळ गावात आपले वास्तव्य सुरू केले. जळलेल्या घरांची सांगाडे अजूनही गावात उभे आहेत.

व्हिडीओ – लोकसत्ता टीम

हेही वाचा – गडचिरोली : सावरकरांचा जन्मदिन ‘गौरव दिवस’ म्हणून साजरा करणे हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान; नक्षलवाद्यांच्या पत्रकाने खळबळ

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतर पहिल्यांदा झाले होते झेंडावंदन

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर साजरा होत असताना येथे ७४ वर्षांपर्यंत स्वातंत्र्याचा तिरंगा ध्वज फडकला नव्हता. २०२० साली पहिल्यांदाच कोलाम विकास फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विकास कुंभारे यांनी येथे पहिल्यांदाच १५ ऑगस्टला तिरंगा ध्वज फडकवत झेंडावंदन केले होते. येथे कोलामांच्या प्रश्नांवर आंदोलन करत रस्ता, पिण्याचे पाणी व मुलभूत सुविधा उपलब्ध कराव्या, या समस्यांकडे लक्ष वेधले. ॲड. दीपक चटप व सामाजिक कार्यकर्त्यांना तसेच गावातील कोलाम बांधवाना सोबत घेवून डोंगरातून घोडनकप्पीकडे जाणारा रस्ता श्रमदानातून बनवण्यात आला होता.

प्यायला पाणी, मुलांना शाळेत जायला रस्ता नाही

घोडनकप्पी या डोंगरावरील गावात पोहोचायला साधा रस्ताही नव्हता. स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच गावात जायला कच्चा रस्ता शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बनवण्यात आला. मात्र १५० फुटापेक्षा जास्त डोंगराखाली वसलेल्या मुख्य गावात जायला अजूनही रस्ता नाही. डोंगर चढून उतरूनच गावात ये-जा करावी लागते. डोंगरावर इयत्ता ४ थी पर्यंत शाळा आहे मात्र शाळेत जायला रस्ताच नसल्याने पावसाळ्यात मुले शाळेत डोंगर चढून जावू शकत नाही. येथे यंदाच सौर उर्जेवर पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बसवण्यात आली. मात्र या टाकीतील पाणी पोहोचत नसल्याचे गावकरी सांगतात. अजूनही गावकरी जुन्या पडक्या विहिरीतील व नाल्यातील पाणी आणूनच तहान भागवतात.

हेही वाचा – आदिवासीबहुल भागात कोतवाल भरती, मात्र आदिवासींनाच ‘आरक्षण’ नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावकरी म्हणतात….

आमच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. गावात रस्ता नाही. पिण्याचे पाणी नाही. राहायला पक्की घरे नाहीत. खाण्यासाठी पुरेसे अन्न नाही. गावातील कोणी आजारी पडले तर खाटेवर उचलून कोसोदूर डोंगर-दऱ्यातून न्यावे लागते. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत गावातील नागरिक ग्रामसभेतून मिळणारी माहिती, मिळणारे हक्क या सर्व बाबींपासून वंचित राहिले आहेत. आमच्या सरकारी योजना कुठे गेल्या? आम्हाला रस्ता, मुलभूत सुविधा द्या असे मत गावपाटील रामलू जुमनाके व गावकरी व्यक्त करतात.