नागपूर : वाघांच्या अधिवासात त्यांचे प्रमुख भक्ष्य असलेल्या प्राण्यांची संख्या कमी होत आहे. २०१४ ते २०२२ दरम्यान देशातील वाघांच्या अधिवासात चितळ, सांबर आणि रानगवा यासारख्या खूर असणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत अनुक्रमे २८ टक्के, २७ टक्के आणि २८ टक्क्यांनी घट झाल्याचे आढळून आले आहे. भारतीय वन्यजीव संस्थेच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.
भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण यांनी २०२२ च्या अखिल भारतीय व्याघ्र अंदाजातील तपशील वापरून ‘स्टेटस ऑफ अनग्युलेटस इन टायगर हॅबिटॅट्स ऑफ इंडिया’ असा शीर्षक असलेला अहवाल अलीकडेच प्रसिद्ध केला. देशातील वाघांच्या अधिवासात चितळ, सांबर आणि रानगवा यासारख्या प्राण्यांच्या संख्येत घट झाल्याचे वन्यजीव संस्थेच्या अहवालात आढळून आले आहे. प्रति शंभर चौरस किलोमीटरमध्ये चार वाघांसाठी प्रतिचौरस किलोमीटर ३० खूर असणारे प्राणी आवश्यक आहेत. मात्र, अधिवासाचे विखंडन तसेच मानव-वन्यजीव संघर्ष यामुळेदेखील चितळ, सांबर आणि रानगवासारख्या प्रजातीची संख्या कमी होत असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.
सुमारे २७ टक्के ठिकाणी वाघांच्या प्रमुख भक्ष्यात घट झाली आहे. ओडिशामध्ये वाघांना आवश्यक खाद्य आणि वाघांची घनता दोन्ही कमी आहेत. मध्य भारतातील कॉरिडॉरचा महत्त्वाचा भाग असलेल्या पलामाऊ व्याघ्र अभयारण्यातही खूर असणारे प्राणी आणि बिबट्यांची घनता खूप कमी आहे. दशकाहून अधिक काळापासून याठिकाणी निवासी वाघांची संख्या नाही. महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्पांमध्ये आणि प्रामुख्याने ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प तसेच मध्य प्रदेशातील रतापाणी येथे मांसाहरी प्राण्यांचे प्रमाण जास्त आहे. मात्र, त्यांना आवश्यक असणारे भक्ष्य कमी आहे. त्यामुळे या भागात पशुधनाच्या शिकारीचे प्रमाण अधिक आहे.
अहवालात चिंता
आंध प्रदेशातील नागार्जुन सागर आणि तेलंगणातील अमराबाद यासारख्या प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वेगाने वाढत आहे, पण शिकारीची घनता मात्र कमी आहे. भारतातील एक चतुर्थांशपेक्षा जास्त वाघांच्या अधिवासात चितळ, सांबर आणि रानगवा यासारख्या प्रजातींच्या कमी होत चाललेल्या संख्येबद्दल या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.