चंद्रपूर:जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढले असून सलग तिसऱ्या दिवशी मूल तालुक्यातील भादुर्णी येथे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या भूमिका दिपक भेंडारे (३०) या महिलेवर वाघाले हल्ला केला असता तिचा घटनास्थळीच मृत्यु झाली. तीन दिवसात वाघाने घेतलेला हा पाचवा बळी आहे. दरम्यान या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न केला. या जिल्ह्यात मागील तीन दिवसात वाघाचे हल्ले वाढले असून सिंदेवाही व मूल या दोन तालुक्यात पाच महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्या आहेत.
वाघाची दहशत व भिती सर्वत्र आहे. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिला जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात. मूल तालुक्यातील भादुर्णी येथेही आईच्या घरी वास्तव्याला असलेली भूमिका दिपक भेंडारे सकाळी आठ वाजताच्या सुमारास तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेली होती. यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. यात भूमिकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी संतप्त ग्रामस्थानी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा भमिकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जंगलात पडून होता.
वन अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांवर प्रचंड संताप व्यक्त करून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली. तर काही ग्रामस्थांनी रागाच्या भरात जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न केला. वन विभागाच्या अधिकारी व पथकाने वेळीच ग्रामस्थांना मज्जाव केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जाणे आता कठीण झाले आहे. तेंदूसाठी जंगलात गेले तरी परत येणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा वन विभागाने वाघाला जेरबंद करावे अशी मागणी कॉग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
शनिवारी वाघाच्या हल्ल्यात सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपवनक्षेत्र डोंगरगाव मधील चारगाव कक्ष क्रमांक २५२ मध्ये कांता बुधाजी चौधरी (६५) शुभांगी मनोज चौधरी (२८ ) या सासू व सुनेसोबतच रेखा शालिक शेंडे (५०) या तीन महिलांचा मृत्यु झाला. त्यानंतर रविवारी मूल तालुक्यातील महादवाडी येथे विमला बुधा शिंडे (६८) या महिलेचा मृत्यु झाला. तर तिसऱ्या दिवशी वाघाने पून्हा एका महिलेचा बळी घेतल्याने सर्वत्र वाघाची दहशत व भिती पसरली आहे.
विधिमंडळ पक्षनेते तथा लोक लखा समिती अध्यक्ष व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपवनसंरक्षक राकेश सेपट, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, पोलीस निरीक्षक राठोड तसेच उपस्थित गावकरी व वन विभाग कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यांच्याशी तात्काळ चर्चा करून हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा तसेच घडलेल्या घटनेचा गांभीर्याने विचार करून मृतकांच्या कुटुंबीयातील व्यक्तीला वनविभागाच्या सेवेत रुजू करून घ्या. मृताच्या कुटुंबीयांना विभागाकडून देय असलेला मोबदला तात्काळ देण्याची निर्देश दिले.