यवतमाळ : वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीतही वीज ग्राहकांना वाऱ्यावर सोडून मुख्यालयी न थांबणे, तसेच वरिष्ठांच्या पत्राला उत्तर न देणे, वीज बिल वसुलीत हयगय करून महावितरणचा महसूल गोठविणे आणि महावितरणच्या सेवेबाबत असलेल्या निष्काळजीपणामुळे दारव्हा ग्रामीण वितरण केंद्र -२ येथील सहाय्यक अभियंता राहुल डोंगरे यांना महावितरणच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता यांनी ही कारवाई केली आहे.
यंदा मान्सूनच्या आगमनापूर्वीच जिल्ह्यासह राज्यात मुसळधार पावसासह वादळ वाऱ्याची दररोज हजेरी सुरू आहे. या पार्श्वभूमिवर महावितरणने हाय अलर्ट जारी केला असून आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची परिमंडळ स्तरावर स्थापना केली आहे. तसेच वादळ वाऱ्यामुळे खंडित झालेला वीज पुरवठा तातडीने दुरूस्त करता यावा, यासाठी पूर्व परवानगीशिवाय कोणीही मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.
तथापि दारव्हा विभागात मंगळवार संध्याकाळच्या दरम्यान झालेल्या वादळासह मुसळधार पावसामुळे १२ उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे जवळपास ४० हजार ग्राहकांची रात्र अंधारत गेली होती. अश्या आपात्कालिन परिस्थितीत महावितरणच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन सांघिक काम करणे अपेक्षित असताना सहाय्यक अभियंता राहुल डोंगरे हे मुख्यालयी न थांबता आणि कोणतीच पूर्व परवानगी न घेता वर्धा येथे निघून गेल. ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयात हजर झाले. यामुळे संबंधित सहाय्यक अभियंता यांची महावितरण आणि ग्राहकांविषयी कोणतीच आस्था दिसून येत नसल्याचे स्पष्ट होते, असे महावितरणने म्हटले आहे. याचबरोबर डोंगरे यांनी कर्तव्यात प्रामुख्याने वरिष्ठ कार्यालय तसेच अधिकारी यांना विजबिलाच्या वसुलीबाबत दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणे, विशेष म्हणजे सेवाविनिमयातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई संदर्भात देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर न देणे, अधिनस्त कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवणे, मुख्यालयी न राहणे इत्यादी बाबी निदर्शनास आल्या. त्यांचे हे व्यवहार हे केवळ महावितरणच्या परिपत्रकाचे तसेच सेवा शर्तीचे उलंघन करत नाहीत, तर महावितरणचे आर्थिक नुकसाने करणारे असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
ग्रामीण भागात अवस्था बिकट
सध्या सर्वत्र वादळी पावसाचे थैमान सुरू आहे. ग्रामीण भागात महावितरणचे अधिकारी मुख्यालयी न राहता शहरात राहतात. रात्रीच्या वेळी ते नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी येत नसल्याची ओरड नेहमीच होते. महावितरणावर राजकीय दडपण आल्यानंतरच कारवाई होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज खंडित झाली तर गावांमध्ये दुसऱ्यादिवसापर्यंत प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरत नाही.