यवतमाळ – एका तृतीयपंथीयाची गळा आवळून हत्या करण्यात आली. ही घटना कळंब तालुक्यातील पिंपळशेडा शिवारातील कैलासपोड नाल्यालगत उघडकीस आली. नंदकिशोर उर्फ सोनाली अर्जुन ठाकरे (२९), रा. मोहा त. जि. यवतमाळ असे मृत तृतीयपंथीचे नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ तालुक्यातील मोहा येथील तृतीयपंथी नंदकिशोर उर्फ सोनाली हीचा कळंब तालुक्यातील पिंपळशेडा शिवारातील कैलासपोड नाल्यालगत नागरिकांना मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटनास्थळी पाहाणी केली. यावेळी नंदकिशोर उर्फ सोनालीचा गळा आळवून खून केल्याची बाब समोर आली.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता शासकीय रूग्णालयात पाठविला. दरम्यान सर्व प्रथम पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला, त्यानंतर मृतक नंदकिशोर उर्फ सोनालीची आई अनिता ठाकरे यांनी कळंब पोलिसात तक्रार दिली. तक्रारीत मृतकाचा मित्र असलेला ड्रायव्हर व मृतक नंदकिशोर यांच्यात दोन-तीन दिवसापासून किरकोळ भांडण झाल्याचे नमूद केले. त्यामुळे किरकोळ भांडणाच्या कारणावरूनच सोनालीची हत्या झाल्याची शंका व्यक्त होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर भारस्कर करीत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्यासह एलसीबीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कळंब गाठून घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेला २४ तासाचा कालावधी लोटला असून अद्यापही मारेकऱ्यांचा सुगावा पोलिसांना लागला नाही. यातील मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, तृतीयपंथी नंदकिशोर उर्फ सोनाली ठाकरे हिच्या हत्या प्रकरणानंतर एलसीबीतील अधिकारी, कर्मचारी कळंब गाठून चौकशी केली. त्यानंतर परिसरातील चार ते पाच संशियताना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र त्या चौकशीत सध्या काही निष्पन्न झाले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतदेह कारमधून फेकला?

घटनेच्या दिवशी एक पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन पिंपळशेडा येथून कैलासपोडच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले. यावेळी गाडीचे तुटलेले पायदान सुद्धा गाडीतून फेकून देण्यात आले, अशी माहिती परिसरातील प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. हे पायदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर तृतीयपंथीयाचा मृतदेहसुद्धा कारमध्ये आणून नाल्यालगत फेकून दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनास्थळ राज्य महामार्गापासून आतमध्ये असून, या ठिकाणी वर्दळ नसल्याने सोनालीचा इतरत्र खून करून मृतदेह येथे आणून टाकल्याची चर्चा आहे.