मळणी यंत्रात सोयाबीन लोटत असताना एका पंचवीस वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना पिंप्री देशमुख (ता. खामगाव) येथे घडली. मळणी यंत्रावर काम करणाऱ्या मजुरांना अडीचशे ते तीनशे रुपये प्रती पोते मिळतात. त्यामुळे अधिकाधिक सोयाबीन काढण्याकडे मजुरांचा कल असतो. यामुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा आहे. हेही वाचा >>>बुलढाणा : अजब चोरीची गजब कथा! वाहन गुजरातचे, चोरले उत्तरप्रदेशमधील चोरट्याने अन् पकडले खामगाव पोलिसांनी ज्ञानेश्वर दामोदर अढाव (२५, रा. पिंप्री देशमुख) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा ही दुर्घटना घडली. पिंप्री देशमुख येथील दिलीप भास्कर देशमुख यांच्या शेतातील सोयाबीन मळणी यंत्राने काढणे सुरू होते. रामेश्वर प्रल्हाद थोरात यांच्या मालकीच्या (एमएच २८ /एजे /२१२५ या क्रमांकाच्या) ट्रॅक्टरला जोडलेल्या मळणी यंत्रावर ज्ञानेश्वर सोयाबीन लोटत होता. मात्र, अचानक त्याचा हात मळणी यंत्रात गेल्याने तो आत ओढला गेला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.