नागपूर: नागपुरात एका तरुणाने प्रेयसीसोबत बोलणं बंद झाल्याने तिच्या घरासमोर उभ्या असलेल्या तीन दुचाकींना आग लावली. तीन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते, पण कुटुंबीयांना हे नातं मान्य नसल्याने प्रेयसीने बोलणं टाळलं. याच रागातून प्रियकराने हे कृत्य केले असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रेम ही भावना खूप सुंदर आहे. प्रेमात अनेकदा कठीण प्रसंग येतात. अशा परिस्थिला आपण कसं सामोरं जातो ते देखील महत्त्वाचं आहे. पण काही जणांना तेच जमत नाही. नागपुरात एका तरुणाने प्रेयसीने बोलणं बंद केल्याने संतापजनक प्रकार केला. खरंतर प्रेयसी ही कुटुंबाच्या दबावाने तसं वागत होती. यावेळी तरुणाने तिला समजून घेणं जास्त आवश्यक होतं. तसेच तिच्या कुटुंबियांचं मन जिंकणं आवश्यक होतं. पण या प्रकरणातील तरुणाने या विपरित पराक्रम केला. त्याने थेट प्रेयसीच्या घरासमोरील वाहनांची जाळपोळ केली.
बोलणे बंद केल्याने प्रियकराने प्रेयसीच्या घरी गोंधळ घालून वाहनांची जाळपोळ केली. ही थरारक घटना कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्नेहल सुनील अंबादे (वय २२,रा. कपिलनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. तो पेंटिंगचे काम करतो.
स्नेहलचे गेल्या तीन वर्षांपासून अनामिका (वय २२, नाव बदललेले) हिच्यासोबत प्रेमसंबंधात आहेत. त्यांच्या प्रेमाबाबत अनामिकाचा भाऊ अभिषेक याला माहिती मिळाली. त्याने आई-वडिलांना सांगितले. त्यामुळे अनामिकाने स्नेहलसोबत बोलणे आणि भेटणे बंद केले. अनामिका घरीच राहायची. अनामिका भेटत नसल्याने स्नेहल संतापला. तो तिला भेटण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्याला अपयश आले.
तरुणाचं धक्कादायक कृत्य
स्नेहल अंबादे शनिवारी मध्यरात्री अनामिकाच्या पहिल्या माळ्यावरील खोलीजवळ गेला. यावेळी अनामिका ही खोलीत होती. त्याने दरवाजा ठोठावला. अनामिकाने दरवाजा उघडला नाही. तो गोंधळ घालून शिवीगाळ करायला लागला. याचदरम्यान त्याने घरासमोरील तीन मोपेड जाळल्या. शेजारी जमले. त्यांनी अनामिकाचा भाऊ अभिषेकला आवाज दिला. अभिषेकने दरवाजा उघडला असता वाहने जळताना दिसली. पाणी टाकून अभिषेक आणि शेजाऱ्यांनी आग विझवली. दरम्यान, स्नेहल पसार झाला. अभिषेकने कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.