लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: सुरगाणा तालुक्यातील कित्येक वर्षाचा अनुशेष भरण्यासाठी मोर्चा काढणाऱ्यांपेक्षा ४०५ कोटी रुपयांची विकास कामे करणारे आमदार नितीन पवार आणि राष्ट्रवादीच्या मागे खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. जनतेने साथ दिली तर विकास होतो. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असतांना शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे टक्केवारीचे सरकार ताम्रपट घेऊन आलेले नाही. सरकार येतात आणि जातात, अशी टीकाही पवार यांनी केली.

सुरगाणा तालुक्यातील हतगड येथे झालेल्या शेतकरी मेळावा आणि कृतज्ञता सोहळ्यात अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. नितीन पवार, आ. माणिकराव कोकाटे, आ. दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, श्रीराम शेटे, नगराध्यक्ष कौतिक पगार, जि. प. सदस्या जयश्री पवार आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-नाशिक: वाहनातून एटीएम यंत्र पळविले, पोलिसांना गुंगारा देत पोबारा

शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक असतांना मंत्र्यांचे हेलिकॉप्टर फिरण्यासाठी कामांमधून एक टक्का घेतला जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. महिला बचत गट, खावटी कर्ज, शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा या गोष्टी महाविकास आघाडीने केल्याचे सांगत सरकारने कांदा उत्पादकांना न्याय न दिल्यास शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा पवार यांनी दिला.

प्रास्ताविक चिंतामण गावित यांनी केले. यावेळी सुरगाणा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सरपंचांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आ. नितीन पवार यांनी अजित पवारांनी ४०५ कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल आभार मानले. आमदार कोकाटे यांनी माजी आमदार गावितांचे नाव न घेता मोर्चा काढण्याने विकास होत नसल्याचा टोला लगावला. नरहरी झिरवाळ यांनी सध्याच्या सरकारचा निधी देण्याचा आणि परत घेण्याचा धोरणांचा आढावा घेत सरकारवर टीका केली.

आणखी वाचा- नाशिक: वीज कोसळून बालकाचा मृत्यू, नैसर्गिक आपत्तीत तीन जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची बांधणी करणारी सक्षम महिला राजकारणी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांचा अजित पवार यांनी विशेष सत्कार केला. जयश्री पवार यांचा आदर्श इतर महिलांनी घेऊन राजकारणात वाटचाल करण्याचा सल्ला दिला. जयश्री पवार यांनी दिंडोरी लोकसभा लढविण्याचे आवाहन झिरवाळ यांनी केले.