लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरून महायुतीतील तीनही पक्षात अटीतटीचा संघर्ष सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सात दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. दुसरीकडे, दोन आठवड्यांपासून उमेदवारीसाठी सातत्याने ठाणे, मुंबईला खेटा मारणारे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी आता थेट दिल्ली गाठली आहे. महाराष्ट्र सदन येथे गुढीपाडवा साजरा करण्यासाठी दिल्लीला आल्याचे कारण त्यांनी दिले आहे. यानिमित्ताने भाजपच्या काही नेत्यांशी भेटीगाठीचा मार्ग त्यांच्याकडून अवलंबला जाण्याची शक्यता आहे.

nashik lok sabha,
नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

नाशिकच्या जागेचा तिढा दिवसागणिक जटील होत आहे. कुरघोडीच्या राजकारणात महायुतीतील तीनही पक्ष परस्परांविरोधात उभे ठाकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीने वादरहित नवीन चेहऱ्याची चाचपणी सुरू केली आहे. परंतु, या जागेवर दावेदारी करणारे इच्छुक आणि पक्षांचे नेते तसूभरही मागे हटायला तयार नसल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाची ही जागा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निकराचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपने उघडपणे तर राष्ट्रवादीने शांतपणे आपली मागणी लावून धरली. नाशिकच्या जागेसाठी आपण इच्छुक नाही. दिल्लीतील बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्याने आपले नाव सुचवले. राष्ट्रवादीने आदेश दिल्यास आपणास निवडणूक लढवावी लागेल, असे भुजबळ यांनी यापूर्वीच म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना धक्का दिला होता. या जागेवर भुजबळांना उमेदवारी मिळेल, अशी आशा आजही भुजबळ समर्थकांना आहे.

आणखी वाचा-नाशिक: सिडकोत गोळीबार, तलवारी फिरवत दहशत; सहा संशयित ताब्यात

दोन एप्रिलपासून भुजबळ हे मुंबईतच ठाण मांडून आहेत. आठवडाभरात ते एकदाही नाशिकला आले नाहीत. असे सहसा होत नाही. उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी समर्थकांकडून होत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा खास भुजबळ फार्म येथे आणण्यात आला आहे. नाशिकला आल्यानंतर भुजबळ हे पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करतील, अशी योजना आखण्यात आल्याचे समजते. सर्व तयारी करणारे समर्थक आता फक्त उमेदवारी कधी जाहीर होईल, या प्रतिक्षेत आहेत. या जागेसाठी भुजबळ हे पडद्यामागून मोर्चेबांधणी करीत आहेत. एकदा उमेदवारी जाहीर झाली की, ते नाशिकला येतील, असे निकटवर्तींकडून सांगितले जाते.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी दोन आठवड्यांत अनेकदा ठाणे, मुंबई वाऱ्या केल्या. तीन, चार दिवस ते मुंबईत राहिले. तत्पूर्वी, उमेदवारी जाहीर करावी म्हणून त्यांच्यासह शिंदे गटाच्या सर्वांनी ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या दिला होता. बराच पाठपुरावा करूनही तिढा सुटत नसल्याने सोमवारी गोडसे हे थेट दिल्लीत पोहोचले. महाराष्ट्र सदन येथे दरवर्षी आपण गुढी पाडवा साजरा करतो. या कार्यक्रमासाठी आपण दिल्लीला आल्याचे गोडसे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी गोडसेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. दिल्ली दौऱ्यात ते भाजपच्या अन्य नेत्यांच्या भेटीगाठी घेऊ शकतात. परंतु, तशी कुणाचीही भेट घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा-दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ

भाजप निश्चिंत?

शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इच्छुक जागा आपल्याकडे राखण्यासाठी धडपडत असताना भाजपने या जागेवरील आपला दावा सोडलेला नाही. या मतदारसंघातील पक्षाची ताकद भाजपची सर्व नेतेमंडळी वारंवार अधोरेखीत करतात. प्रारंभी गोडसेंच्या नावाला विरोध केल्यानंतर सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी नाशिकची जागा भाजपकडे घ्यावी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. या भेटीनंतर नेतेमंडळींनी मित्रपक्षांसारखी धावपळ केली नाही. भुजबळ यांचे नाव समोर आल्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया वरिष्ठांना कळविल्या. भाजपच्या भूमिकेवर उमेदवार ठरणार असल्याने ते निश्चित आहेत. नवीन सर्वेक्षणात कुणाचे नाव समोर येते, याकडे त्यांचे लक्ष आहे.