भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आव्हाडांवरील गुन्हा खोटा असून राज्य सरकार दपडशाही करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे, तर ही कारवाई कायद्यानुसार झाली असल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या याप्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – “पोलीस नियमांनुसार कारवाई करतील”, जितेंद्र आव्हाडांवरील गुन्ह्यावरून मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय…”

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

“जितेंद्र आव्हाडांनी त्या महिलेला धक्का मारला की नाही, हे त्या महिलेला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे महिलेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हा खोटा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. याबाबत विचारलं असता. “खोटे गुन्हे दाखल व्हायला हे महाविकास आघाडी सरकार नाही”, असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.

हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून अजित पवारांची शिंदे सरकारवर टीका; म्हणाले, “मुख्यमंत्री गाडीत असताना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी बोलताना त्यांनी ठाण्यातील चित्रपटगृहात झालेल्या मारहाण प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्रात आता पूर्वीसारखं गुंडाराज राहिलेलं नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा विरोध करायचा असेल तर त्याची एक प्रक्रिया असते. तुम्ही थेट चित्रपटात जाऊन गुंडागर्दी नाही करू शकत. हे महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती नाही”, असेही त्या म्हणाल्या.