जळगाव – आक्रोश मोर्चानंतर जिल्हा प्रशासनाने शेतीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असले, तरी मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या २८ तारखेला दुसरा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला. तेव्हा माझ्या गावात येऊन तर दाखवा, असे थेट आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. बच्चू कडू यांनी तेही आव्हान स्वीकारल्यावर आता मात्र पालकमंत्री पाटील यांनी त्यांच्या स्वागताची भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याच धर्तीवर जळगावमध्येही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या माध्यमातून काळ्या फिती लावून तसेच काळे कपडे घालून सरकारचा निषेध करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करून केळी, कापूस, कांदा, मका, ज्वारी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. दोघांनी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका केली.
बच्चू कडू यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला होता. तुमच्या जिल्ह्यातील संकटमोचक फक्त पक्षासाठी आहेत, ते जनतेसाठी नाहीत. हे सगळे गुलाम आहेत. एकेकाळी जोरात आवाज करणाऱ्यांचा आता आवाज निघत नाही, असा टोलाही त्यांनी विशेषतः मंत्री पाटील यांना हाणला होता. आक्रोश मोर्चानंतरही बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्ह्यातील चारही मंत्र्यांवर शेतीप्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल टिकास्त्र सोडले. शेतीप्रश्न न सुटल्यास आता दुसरा मोर्चा थेट पालकमंत्र्यांच्या घरावर काढायचा आहे. त्यासाठी २८ तारखेला तयार राहावे, असेही आवाहन शेतकऱ्यांना केले.
दरम्यान, धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. माझ्या घरावर मोर्चा काढण्याच्या गोष्टी तुम्ही करतात. तूच येना रे काका… पाळधी गावात येऊन तर दाखव, अशा एकेरी भाषेत त्यांनी बच्चू कडू यांना थेट लक्ष्य केले. अर्थात, गुलाबराव पाटील यांचे आव्हान बच्चू कडू यांनीही त्याच दिवशी स्वीकारले. आणि त्यांच्या पाळधी गावात येण्याची तारीख सांगून टाकली. अशा स्थितीत, मंत्री पाटील यांनी आता नरमाईची भूमिका घेतली असून बच्चू कडू यांच्या स्वागताची भूमिका घेत खास खान्देशी झुणका-भाकर आणि चहाची सोय त्यांच्यासाठी करण्याची तयारी सुद्धा दर्शवली आहे. ते माझ्या गावात येणार म्हटल्यावर मी त्यांना या म्हटले होते, अशीही सारवासारव त्यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.