नाशिक – भाजपला लोकसभा जितकी महत्वाची आहे, तितकीच आम्हाला विधानसभा निवडणूक महत्वाची आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीवेळी विधानसभेची जागा निश्चिती झाली तरच, भाजपला मदत करता येईल, असा सूचक इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी येथे दिला.

भाजपने लोकसभेपूर्वी विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न सोडवायला हवा. आम्हाला दुसऱ्या कुणाच्या कोट्यात जाण्याची गरज नाही. प्रहार हाच आमचा कोटा आहे. जागा वाटपाचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही जळगाव, अमरावती या ठिकाणी निवडणुका लढू, असे त्यांनी सूचित केले. राजकीय नेत्यांमुळे समाजात दुही निर्माण होत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी नागरिकांनी आपल्यासह कुठल्याही राजकीय नेत्यांच्या विधानांना फारसे गांभिर्याने घेऊ नये, असा सल्ला दिला. प्रत्यक्षात काय घडते, आपण एकोप्याने किती चांगले राहू शकतो याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. आता निवडणुका असून धर्म, जातीच्या लढाईत आपल्या हक्काची लढाई मागे रहात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सोयाबीन, कापसाचे भाव पडलेले आहेत. कांदा व संत्री उत्पादक अडचणीत आहे. सरकारचे संबंधितांकडे लक्ष नसल्याचा निषेध करीत असल्याचे कडू यांनी सांगितले.

हेही वाचा >>>राजीनामा मंजूर होत नसल्याने मंत्री म्हणून काम – छगन भुजबळ यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याणमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर कडू यांनी बंदूक देशासाठी काढा, शेतकरी, मजूर, कष्टकऱ्यांसाठी गोळी मारली असती तर आम्ही त्याचे स्वागत केले असते. उपरोक्त प्रकरणात संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालयाकडून केलेल्या कारवाईच्या मागणीची त्यांनी खिल्ली उडवली. या संदर्भात राऊत यांनी लेखी तक्रार द्यायला हवी. प्रसारमाध्यमांकडे तक्रार करून गुन्हे दाखल होत नाही. सोमय्या यांच्याप्रमाणे त्यांनी कागदपत्रे घेऊन फिरावे, असा टोला कडू यांनी लगावला.