जळगाव : शहरातील मेहरूण परिसरात गेल्या आठवड्यात सोन्याच्या लालसेने मृत महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमीतून अस्थींची चोरी झाली होती. तसाच प्रकार सोमवारी सकाळी पुन्हा शिवाजीनगर स्मशानभूमीत घडल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्याबद्दल नागरिकांनी चिंताही व्यक्त केली आहे.
गायत्रीनगरातील रहिवासी असलेल्या छबाबाई काशिनाथ पाटील (७४) यांचे पाच ऑक्टोबरला निधन झाले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर मेहरूण भागातील महापालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु, तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा करण्यासाठी नातेवाईक जेव्हा स्मशानभूमीत पोहोचले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. छबाबाई यांचे डोके, हात आणि पायाच्या अस्थी गायब असल्याचे दिसून आले. यानंतर पाटील कुटुंबियांनी त्यांच्या आईंच्या अंगावरील सोने काढण्यासाठी अस्थी चोरी केल्याचा आरोप केला. मृत छबाबाईंचे पुत्र राजेंद्र पाटील आणि कुटुंबियांनी आम्हाला सोने नको आहे; फक्त आईंच्या अस्थी परत मिळाव्यात, अशी मागणी केली होती. प्रत्यक्षात, अस्थी चोरणाऱ्यांचा शोध लागलाच नाही.
छबाबाई पाटील यांच्या गळ्यात एक तोळा वजनाचे सोन्याचे मणी, नाकात नथ, सोन्याची टिकली, कानात बाळ्या आणि कुडके, असे जवळपास दोन तोळे (२० ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने होते. छबाबाईंना सोन्याच्या दागिन्यांची विशेष आवड होती आणि त्यांनी मृत्यूनंतरही त्यांचे दागिने अंगावरच राहावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार, त्यांच्या कुटुंबियांनी आईच्या इच्छेचा आदर म्हणून दागिने अंगावरच ठेवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार उरकले होते. परंतु नंतर चोरट्यांनी छबाबाईंच्या अस्थी आणि सोन्याचे दागिने चोरी केले. याच घटनेची पुनरावृत्ती सोमवारी सकाळी जळगावमधील शिवाजीनगर स्मशानभूमीतही झाली.
खडके चाळीत राहणाऱ्या जिजाबाई पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्यावर शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्यांचे नातेवाईक अस्थी जमा करण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता, अंत्यसंस्कार केलेल्या जागेवरून डोक्याच्या आणि पायाच्या भागातील राख आणि अस्थी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात आला. जिजाबाई पाटील यांच्या अंगावरील सुमारे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने देखील यावेळी चोरट्यांनी लंपास केले होते. यादरम्यान, आणखी एक विचित्र गोष्ट पाटील परिवाराला दिसून आली. चोरट्यांनी अस्थींसह दागिने चोरले असले, तरी जिजाबाईंवर अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी पंचपक्वान्नाचे पान ठेवल्याचे आढळून आले. अंधश्रद्धेपोटी चोरट्यांनी भोजनाचे पान ठेवले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
जळगावमध्ये आठवडाभराच्या अंतराने दोन वेळा सोन्याच्या लालसेने स्मशानभूमीतून महिलांच्या अस्थींची चोरी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. प्रत्यक्षात, पहिल्या वेळी मेहरूण भागात अस्थींची चोरी झाली तेव्हाच सुरक्षा रक्षक नेमण्यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी झाली होती. परंतु, महापालिका प्रशासनाने स्मशानभूमींमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली नाही किंवा सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही केली नाही. दागिन्यांच्या लालसेने चोरट्यांची थेट स्मशानभूमीतील अस्थी चोरण्यापर्यंत मजल गेल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.