नाशिक – मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावांचा संपर्क तुटणे नवे नाही. पूर परिस्थिती असतानाही जीव मुठीत धरत संबंधित भागातून ये-जा करणे धोकादायक आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते येथील ग्रामस्थ तसेच विद्यार्थी यांना प्रत्येक पावसाळ्यात या दिव्यातून जावे लागत होते. कळमुस्तेजवळील ओहळास प्रत्येक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी राहत असल्याने मागील वर्षापर्यंत हा धोका पत्करण्यात येत होता. यंदा मात्र या ओहळावर पूल तयार झाल्याने विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत थांबली आहे.

कळमुस्तेजवळील हर्षवाडी येथे दोन आदिवासी पाडे आहेत. यातील एका पाड्यावर अंगणवाडी केंद्र आणि जिल्हा परिषदेची शाळा आहे. संबंधित पाड्यातील मुलांना हर्षवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ओहळ ओलांडणे भाग पडत होते. पावसाचे पाणी जास्त असल्यास ओहळ ओलांडणेही अवघड होत असे. ये-जा करणे शक्य नसल्याने शाळाही बंद असे. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असे. या ओहळावर पूल करावा, गावाकडे जाणारे रस्ते पक्के करावेत, अशा मागण्या सातत्याने ग्रामस्थांकडून करण्यात येत होत्या. याबाबत एल्गार सामाजिक संघटनेच्या वतीने वेळोवेळी पत्र व्यवहार करत सार्वजनिक बांधकाम विभागासह प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर संबंधित विभागाच्या वतीने ओहळावर पूल बांधण्यात आला. मे अखेरपर्यंत पूल बांधण्याचे काम सुरू होते. जूनमध्ये पूल वाहतुकीसाठी खुला झाला. यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत थांबली आहे. पूलामुळे आता ओहळास भरपूर पाणी असले तरी सहजपणे ये-जा करणे शक्य झाले आहे.