धुळे – विधानसभा निवडणुकीत आपली लढाई ही चोरांविरुध्द आहे. ऑल इंडिया उलेमा बोर्ड आणि पर्सनल बोर्डाच्या १७ अटी मान्य करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सौदा करण्याचे पाप केले, अशी टीका भाजप महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

शहरातील नकाणे रोडवरील राधेकृष्ण भवनात सोमवारी भाजप महायुतीचा महिला मेळावा झाला. या मेळाव्याला भाजप महायुतीचे उमदेवार अनुप अग्रवाल, उत्तर महाराष्ट्र प्रमुख जयश्री अहिरराव, धुळे शहर प्रभारी मुकेश पटेल, जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाठ, मायादेवी परदेशी, माजी खासदार डॉ.सुभाष भामरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>ओबीसींचे हक्क मुस्लीमांना देण्याचा घाट; रविशंकर प्रसाद यांचा काँग्रेसवर आरोप

यावेळी आमदार वाघ यांनी, महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि राष्ट्रवादीवर (शरद पवार) सडकून टीका केली. महाविकास आघाडीने महाराष्ट्राचा सौदा केला आहे. ऑल इंडिया उलेमा बोर्ड आणि पर्सनल बोर्डाने महायुतीसमोर १७ अटी आणि शर्ती ठेवल्या होत्या. जर तुम्हाला आमचा पाठिंबा हवा असेल, तर आमच्या मागण्या मान्य करा, असे त्यांनी सांगितले होते. त्यात २०१२ पासून आतापर्यंतच्या दंगलीमध्ये अल्पसंख्यांकावर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, यांसह १७ मागण्यांचा समावेश आहे. त्या सर्वच्या सर्व मागण्या आघाडीने मान्य केल्या. राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार असताना करोना काळात गोरगरीबांना वाटायची खिचडी आणि मृतदेहांना नेण्यासाठी लागणार्या बॅगांची चोरीही मविआमधील पक्षांनी केली होती. महायुती सरकारने दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये टाकायला चालू करताच आघाडीने योजना चुकीची ठरविली. त्यातील काहीजण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले. तुम्ही महिलांना लाच देता आहेत, असे महाविकास आघाडीमधील नेत्यांनी म्हटले. परंतु, तुम्ही चिंता करु नका, ही योजना बंद होणार नाही, असे वाघ यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

\