धुळे: येथील राष्ट्रीय लोक न्यायालयात वादपूर्व आणि प्रलंबित अशा एकूण चार हजार ३२७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. सात कोटी ७० लाख ३४ हजार रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली हे लोक न्यायालय झाले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शनिवारी धुळे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयात प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. न्यायालयातील प्रलंबित चार हजार ३८५ प्रकरणे सुनावणीस आली. त्यांचा निपटारा करण्यात आला.
या प्रकरणांमध्ये प्रामुख्याने धनादेश न वटणे, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणांचा समावेश होता. वादपूर्व असलेल्या ५५ हजार ३७४ प्रकरणांंमध्ये ग्रामपंचायत, वीज थकबाकी, बँकेची थकबाकी, वित्तीय कंपनीची थकबाकी आणि कौटुंबिक वाद अशा प्रकरणांचा समावेश होता. यापैकी १६५ प्रलंबित प्रकरणे आणि चार हजार १६२ दाखलपुर्व प्रकरणे असे एकूण चार ३२७ समोपचाराने निकाली निघाली.
सुमारे वर्षांपासूनन सुरू असलेला कौटुंबिक वाद राष्ट्रीय लोक न्यायालयात निकाली काढण्यात आला. कौटुंबिक वादामुळे पती-पत्नी वर्षापासून वेगळे राहत होते. दाम्पत्यास २१ वर्षांचा मुलगा आणि १६ वर्षाची मुलगी आहे. दाम्पत्यातील वाद या न्यायालयात योग्य समूपदेशनाच्या माध्यमातून दूर झाला. मोटार अपघाताच्या एका प्रकरणामध्ये मयताच्या वारसांना एकुण ४० लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.
लोक न्यायालयासाठी धुळे जिल्हा वकील संघ तसेच तालुका वकील संघ, पक्षकार, पोलीस, सर्व बँका, सर्व ग्रामपंचायत, महावितरण कंपनी, इत्यादींनी सहकार्य केले.धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, संदीप स्वामी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले, अशी माहिती धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी दिली.