जळगाव : उत्तराखंड राज्यात ढगफुटी झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत असताना, त्यात जिल्ह्यातील एका जवानासह १९ जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, जळगावमधील तिघांशी संपर्क साधण्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आले आहे. उर्वरित १६ पर्यटकांशी बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत संपर्क होऊ शकला नव्हता.

उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटी झाल्यानंतर भूसख्खलन होऊन शेकडो घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबली गेली. अनेकजण बेपत्ता झाले असून त्यांचा अद्याप शोध सुरुच आहे. दरम्यान, काशी दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यातूनही अनेक भाविक गेले होते. ढगफुटीच्या घटनेनंतर जिल्ह्यातून गेलेल्या पर्यटकांशी संपर्क होऊ शकत नसल्याने त्यांचे नातेवाईक इकडे चिंतेत आहेत. धरणगाव शहरातील दोन तसेच त्याच तालुक्यातील पाळधी येथील १३ जणांशी देखील संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामध्ये रोहन दिनेश माळी, रोहित बंडू माळी, मनोज संजय चौधरी, ज्ञानेश्वर संजय माळी, दीपक रत्नाकर सोनार, सगदीक नन्नवरे, दीपक माळी, वैभव गंगवणे, संदीप माळी, विशाल पाटील, राकेश माळी, भूषण माळी आणि पवन यांचा समावेश आहे. याशिवाय, पाचोरा तालुक्यातील जवान सोपान अहिरे हे उत्तराखंडमधील दुर्घटनाग्रस्त भागात कर्तव्यावर होते. त्यांच्याशी देखील संपर्क होऊ शकलेला नाही. जळगाव शहरातील तिन्ही जण सुखरूप असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. उर्वरित पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

उत्तरकाशी दुर्घटनेमुळे जळगावमधील अयोध्या नगरातील अनामिका मेहरा, आरोही मेहरा आणि रुपेश मेहरा हे एकाच कुटुंबातील तिन्ही जण अडकले होते. कुटुंबियांचा त्यांच्याशी तिथे भ्रमणध्वनीला नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेल्या जळगावातील मेहरा कुटुंबाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्तरकाशी येथे संपर्क साधून तिन्ही जण थांबलेल्या गेस्ट हाऊसच्या मालकाशी संपर्क साधला. पर्यटनासाठी गेलेले कुटुंबातील तिन्ही सदस्य तिथे सुखरूप असल्याचे समल्यानंतर मेहरा परिवाराने इकडे सुटकेचा निःश्वास सोडला.