जळगाव : जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येकी पाच जागा जिंकून भाजपसह शिवसेनेने (एकनाथ शिंदे) आपले वर्चस्व सिद्ध केले असले, तरी जेवढ्या काही ठिकाणी शिंदे गटाचे सध्या वर्चस्व आहे तिथे भाजपने आपली माणसे पेरण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, शिंदे गटानेही आता शांत न बसता भाजपला धक्का देण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे दिसत आहे. त्यासाठी भाजप समर्थक माजी आमदाराला पक्षात घेण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत, तिथे पक्षादेश न मानता अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचे प्रकार घडले होते. त्यात भाजपचेही काही पदाधिकारी सामील होते. अर्थात, नंतर देखावा म्हणून संबंधितांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. प्रत्यक्षात निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तितक्यात पक्षादेश न मानल्याने हकालपट्टी केलेल्यांना पुन्हा सन्मानपूर्वक पक्षातही घेण्यात आले होते. भाजपच्या या वर्तनामुळे मुळात शिंदे गट दुखावला गेला होता. कारण, संबंधित अपक्षांमुळे शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांमध्ये बरीच चुरस निर्माण झाली होती. शिंदे गटाच्या आमदारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत महायुतीशी बंडखोरी करणाऱ्यांसोबत लढावे लागले होते. अशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) अमळनेरमधील आमदारालाही बंडखोरीचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, भाजपने स्वपक्षाच्या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेण्याची भूमिका घेतली असतानाच, आता शिंदे गटाच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत आव्हान देणाऱ्या ठाकरे गटासह काँग्रेसच्या लोकांनाही आपल्या पक्षात घेण्यास सुरूवात केली आहे. भाजपने काही दिवसांपूर्वी पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांना पक्षात घेतले तेव्हा शिंदे गटाला फार आश्चर्य वाटले नव्हते. मात्र, ठाकरे गटाच्या नेत्या आणि आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिंदे गटात चांगलीच खळबळ उडाली आहे. दिलीप वाघ, अमोल शिंदे आणि वैशाली सूर्यवंशी, हे तिघे प्रतिस्पर्धी म्हमून उभे राहिल्याने पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना विधानसभेची निवडणूक खूपच जड गेली होती. आणि आता त्याच तिन्ही प्रतिस्पर्धींना आपल्या पक्षात घेऊन भाजपने शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

अशा स्थितीत, शिंदे गटानेही डावपेच आखण्यात तरबेज असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना थेट शह देण्यासाठी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. विशेष म्हणजे चौधरी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. २०१४ मध्ये पहिल्यांदा अमळनेरमधून अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतर चौधरी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली. परंतु, राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल पाटील यांनी त्यांचा त्यावेळी पराभव केला होता. २०२४ च्या निवडणुकीत अमळनेरची जागा अजित पवार गटाला सोडण्यात आल्याने चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी केली. परंतु, यावेळीही त्यांना पराभव पत्करावा लागला. दरम्यान, महायुतीच्या उमेदवाराला आव्हान दिल्यानंतर माजी आमदार चौधरी भाजपपासून काही दिवस लांब गेले होते. मुख्यमंत्री फडणवीस फेब्रुवारीत जळगाव दौऱ्यावर आले असता, त्यांची भेट घेऊन चौधरी यांनी मनोमिलनाचा प्रयत्न करून पाहिला. परंतु, भाजपकडून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचे आता निश्चित केले आहे.

भाजपने २०१९ मध्ये मला अमळनेरमधून विधानसभेची उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपच्या काही लोकांनीच गद्दारी केल्याने मी पराभूत झालो होतो. तेव्हापासून मी अपक्ष निवडणूक लढत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आता शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश करत आहे. – शिरीष चौधरी (माजी आमदार, अमळनेर)