जळगाव – शहरातील पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनी गुरूवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. यावेळी हवाई सेवा, क्रीडा व वैद्यकीय सुविधा, जलजीवन मिशनसह सिंचन प्रकल्प, महामार्गावरील बाह्यवळण रस्ता आदी विकासकामांचा आढावा त्यांनी सादर केला. तसेच विकास कामांच्या जोरावर जिल्ह्याचा प्रवास सतत उत्कर्षाच्या वाटेवर राहील, असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेला उद्देशून संदेश दिला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच पालकमंत्र्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. याशिवाय, जिल्ह्याच्या प्रगतीची माहिती देताना सलग तीन वर्षे जिल्हा वार्षिक योजनेतील १०० टक्के निधी खर्च करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश असल्याचे सांगून यंदा ७० कोटींचा वाढीव निधी मंजूर झाल्याचे सांगितले. त्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील मुख्यमंत्री सहायात निधी मदत कक्षाचे लोकार्पण देखील झाले.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एक लाखावर घरकुले पूर्ण झाली असून, सव्वालाख लाख घरकुले प्रगतिपथावर आहेत. तसेच २५ हजार १३२ लाभार्थींना शासकीय जागा वितरित करण्यात आली आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी सर्व घरकुले पूर्ण करून जळगाव जिल्हा १०० टक्के निवारा असलेला राज्यातील पहिला जिल्हा करण्याचा संकल्प देखील पालकमंत्र्यांनी केला. जिल्ह्यात ३० हजार महिला बचतगटांच्या माध्यमातून सुमारे तीन लाख महिला कार्यरत असून, त्यांना ४१० कोटी रुपये कर्ज वाटप झाले आहे. त्यापैकी १.०७ लाख महिला लखपती दीदी झाल्या असून, यावर्षी आणखी एक लाख महिलांना लखपती बनविण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. तसेच ११ ठिकाणी बहिणाबाई मार्ट उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली असल्याचेही मंत्री पाटील यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जलजीवन योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. गेल्या वर्षी एक मे पर्यंत ८३ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत होता. मात्र, सदरची संख्या केवळ आठ गावांवर आली आहे. संपूर्ण जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दीपनगर येथे ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला असून, मुख्यमंत्री सौर वाहिनीअंतर्गत ३२८ मेगावॅट अतिरिक्त वीज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंड वीजपुरवठा शक्य होईल, अशी ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली.