काही दिवसांपासून वातावरणात कमालीचे बदल होत आहेत. कमी होत असलेली थंडी पुन्हा परतली आहे. वातावरणातील या बदलांमुळे रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे घालावेत, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात डिसेंबरच्या उत्तरार्धात थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले असताना वातावरणात पुन्हा थंडी, धुके, गारवा वाढला आहे. सकाळपासूनच घराबाहेर पडताना नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

हेही वाचा >>> राहुल कर्डिले नाशिक मनपाचे नवे आयुक्त; डॉ. अशोक करंजकर यांची उचलबांगडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठिकठिकाणी मोकळ्या मैदानात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. थंडीमुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी असा त्रास होत आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकांना हवेतील गारवा सहन होत नसल्याने डोकेदुखी, अंगदुखी असे मूळ दुखणे डोके वर काढत आहे. हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकल्यासह तापाने अनेक जण फणफणले आहेत. पालकांनी मुलांना थोडे कोमट पाणी पिण्यास द्यावे, शक्यतो घरात तयार केलेलेच पदार्थ खाण्यासाठी द्यावेत. अधूनमधून वाफ घ्यावी, जेणेकरून सर्दीचा त्रास कमी होईल. त्रास जास्त होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा, असा सल्ला डॉ. सुधीर येरमाळकर यांनी दिला आहे.