लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: बनावट कागदपत्रांच्या आधारे घर खरेदी केल्याचे दर्शवित गृह कर्ज घेऊन सात कर्जदारांनी राष्ट्रीयकृत बँकेस तब्बल ८६ लाखाला गंडा घातल्याचे उघड झाले आहे. संबंधितांनी कर्जाचे हप्ते भरले नाही. त्यावेळी बँकेने मालमत्तांसह कर्जदारांचा शोध घेतला असता हा बनाव उघड झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक प्रकाश सावंत यांनी तक्रार दिली. विवेक उगले,अजय आठवले, रोशनी जयस्वार, संतोष जयस्वार,राजू कलमट्टी, अश्विन साळवे व किरण आठवले अशी ठकबाज कर्जदारांची नावे आहेत. भामट्यांनी २०२१ मध्ये गृहकर्जासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे प्रस्ताव सादर केले होते. एन. डी. पटेल रस्त्यावरील केंद्रीय कार्यालयाने कागदपत्रांच्या आधारे संबधितांना गृहकर्ज मंजूर केले. कर्जाच्या रकमा वेगवेगळ्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्या होत्या. पुढे संबंधितांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाही. त्यामुळे बँकेने मालमत्तांसह कर्जदारांचा शोध घेतला असता हा बनाव उघड झाला. बनावट कागदपत्रांच्या आधारे सात कर्जदारांनी ८६ लाख रुपयांना हा गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.