नाशिक : लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षांवरील वृध्द आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा देण्यासाठी अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेत मतदार याद्यांमधील दोष देखील उघड होत आहेत. काही मतदार मयत असताना संबंधितांचे नाव यादीत असून काही ठिकाणी ८० वर्षांपुढील मतदारांची यादी दिली गेली. अपंग नसणाऱ्या व्यक्तीसमोर अपंग मतदार म्हणून उल्लेख झाल्यामुळे अर्ज भरण्याचे काम करणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषालाही तोंड द्यावे लागल्याची काही उदाहरणे आहेत. निवडणूक यंत्रणेने केवळ यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक देत सोपविलेल्या जबाबदारीमुळे मतदार शोधण्यात केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. परंतु, त्यांचे आक्षेप निवडणूक यंत्रणेने फेटाळले. अर्ज भरण्याची प्रक्रिया झाल्यानंतर किती मतदारांना घरबसल्या मतदान करावयाचे, ते स्पष्ट होणार आहे.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या वृध्द आणि अपंग मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा या लोकसभा निवडणुकीत प्रथमच देणार आहे. यासाठी त्यांना प्रथम ‘१२ ड’ अर्जाद्वारे टपाली मतदानाचा पर्याय निवडावा लागणार आहे. या अनुषंगाने निवडणूक यंत्रणेने केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत शहर व ग्रामीण भागात वृध्द व अपंग मतदारांच्या घरी जाऊन १२ ड अर्ज भरून घेण्याचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यात ८५ वर्षावरील ६४ हजार ७५७ तर २३ हजार ४३४ अपंग असे एकूण ८८ हजार १९१ मतदार आहेत. संबंधितांच्या घरी जाऊन ४७३९ बीएलओ अर्ज भरण्याचे काम करत आहेत. यातील बहुतांश शिक्षक असून शाळेतील वार्षिक परीक्षेच्या काळात त्यांना दुहेरी कसरत करावी लागत आहे. या प्रक्रियेत मतदार यादीतील दोष उघड झाल्याकडे त्यांच्याकडून लक्ष वेधले जात आहे.

हेही वाचा : नाशिक : बागलाण तालुक्यात विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

मुळात. मतदाराचे नाव दिले नसल्याने अर्ज भरण्यात अडचणी येतात. यादीत भ्रमणध्वनी क्रमांकही समाविष्ट नाहीत. यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांकावरून प्रथम नाव व नंतर पत्ता शोधावा लागतो. ८५ वर्षावरील वृध्द हा निकष असताना ८० वर्षांपुढील मतदारांचे अनुक्रमांक प्राप्त झाले आहेत. मतदार याद्या पुनर्रिक्षण कार्यक्रमात ज्या मतदारांचे मयत प्रमाणपत्र दाखल केले होते, त्यांची नावे यादीतून वगळली गेली नसल्याच्या तक्रारी बीएलओंकडून केल्या जात आहेत. काही व्यक्ती अपंग नसताना त्यांच्या अनुक्रमांकासमोर तसा उल्लेख आहे. यादीतील गुण-दोषांची माहिती शहरातील शिक्षकांनी प्रशासनासमोर मांडूनही उपयोग झाला नसल्याचे सांगितले जाते. उपलब्ध माहितीतून एकेका मतदाराचा शोध घेऊन अर्ज भरून घेण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या कालमर्यादेत हे काम पूर्ण होणे अशक्य असल्याचे काही बीएलओंचे म्हणणे आहे.

हेही वाचा : महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अधिकच किचकट

घरबसल्या मतदानाची अनेकांची इच्छा

मतदानासाठी केंद्रावर जाण्यास असमर्थ असणाऱ्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी अर्ज भरून घरबसल्या मतदानाची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. काही ज्येष्ठांना ही बाब रुचली नाही. त्यांनी आम्ही अद्याप धडधाकट असून मतदान केंद्रावर जावून मतदान करू, असे बीएलओंना सांगितले. काहींनी वाहन व्यवस्था नसल्याने काही निवडणुकांमध्ये मतदान करता आले नसल्याची खंत व्यक्त केली. नव्या सुविधेमुळे मतदानाची संधी मिळणार असल्याचा त्यांना आनंद आहे. काहींनी वाहन व्यवस्था व मदतनीस मिळाल्यास केंद्रावरही मतदान करता येईल, असे सांगितले. काही अपंग व्यक्तींनी चाकांच्या खुर्चीची (व्हिल चेअर्स) अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा : महायुतीत नाशिकच्या जागेवरून संभ्रम? छगन भुजबळ म्हणतात, “शिंदे गटाएवढ्याच जागा..”

मतदार याद्या ऑनलाईन अद्ययावत करण्याची जबाबदारी बीएलओंची होती. त्यांच्याकडून यादीवर आक्षेप घेतले जात असतील तर, त्यांनी नेमके काय काम केले, हा प्रश्न आहे. घरबसल्या मतदाराचे अर्ज भरण्यासाठी बीएलओंना निकषात बसणाऱ्या मतदारांच्या नावांसह यादी देण्यात आली आहे. केवळ यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक दिलेले नाहीत. ज्या मतदारांनी आठ क्रमांकाचा अर्ज भरला, त्यांच्या नावासमोर अपंगत्वाची नोंद आहे. घरबसल्या मतदानासाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया दोन ते तीन दिवसात पूर्ण होईल.

शशिकांत मंगरुळे (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक)