पैशांचे खोके देऊन सरकार पाडण्यात भाजपला असुरी आनंद मिळत असतो. सध्याच्या मंत्रिमंडळात महाविकास आघाडीच्या तुलनेत अनुभवहीन मंत्री पाहायला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना अब्दुल सत्तार यांना कृषी मंत्रीपद देऊन शेतकर्यांचे आणि कृषी खात्याचे अप्रत्यक्ष नुकसान शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे, असा घणाघात माजी आमदार दिलीप वाघ यांनी केला.
हेही वाचा- “..आणि तशाच प्रकारच्या चिन्हाची निवड करावी लागणार” : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विधान
भडगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनसंवाद यात्रा सुरू असून, या यात्रेस पाचोरा-भडगाव मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यात्रेदरम्यान मतदारसंघातील जनता विविध व्यथा मांडत केंद्र व राज्य सरकार यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत असल्याचे माजी आमदार वाघ यांनी सांगितले. जनसंवाद यात्रेनिमित्त पेंडगाव, शिंदी, कोळगाव, पिंप्रीहाट परिसरातील ग्रामस्थांशी माजी आमदार वाघ यांनी पदाधिकार्यांसोबत जनतेशी संवाद साधला. त्यावेळी शेतशिवार रस्ते, पीकविमा आणि दुष्काळी पंचनामे न झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या.
हेही वाचा- ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबतच्या निर्णयावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रबोधनक ठाकरेंनी…”
मुख्यमंत्री स्वतः मी रिक्षाचालक ते मंत्री असे सांगत असताना शिवसेनेने त्यांच्यावर केलेले उपकार विसरले. त्यांनी भाजपसोबत मिळून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे काम करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. खतावर जीएसटी लावणार, हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगत मतदारसंघातील प्रमुख समस्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे मांडून त्या सोडविण्यासाठी मी आणि पक्षाचे पदाधिकारी सक्षम आहोत. शेतकर्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.